जानेवारी 26-27 रोजी आयोजन : सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिली जाणार
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या आरोग्याच्यादृष्टीने सेंद्रिय अन्नधान्याला अत्यंत महत्त्व आले आहे. कारण सेंद्रिय धान्यामुळे बऱ्याच आजारांना आळा बसू शकतो. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी 26 आणि 27 जानेवारी रोजी येथील सरदार्स मैदानावर दोन दिवस सेंद्रिय धान्यासंदर्भातील तसेच इतर शेती उत्पादनाबाबतचा मेळावा भरविला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी ही माहिती दिली. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन त्यांनी केले.
निरोगी आयुष्यासाठी सेंद्रिय अन्नधान्य तसेच भाजीपाल्याचा वापर करणे महत्त्वाचे बनले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी विभाग आणि विविध कृषी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा भरविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पदयात्रा-सायकलफेरीचे शहरात आयोजन
या कृषी मेळाव्यानिमित्त मंगळवार दि. 24 रोजी सकाळी 6.30 वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता शहरातून सायकलफेरी काढण्यात येणार आहे. दि. 25 रोजी सकाळी 6.30 वाजता पुन्हा सायकलफेरी काढली जाणार आहे. यामध्येही शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 11 वाजता सरदार्स हायस्कूल मैदानावर पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते सेंद्रिय कृषी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, उत्तरचे आमदार अनिल बेनके, आमदार महेश कुमठळ्ळी, दुर्योधन ऐहोळे, पी. राजीव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कृषी मेळाव्यामध्ये ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना ड्रोन घेण्यासाठी 50 टक्क्यांहून अधिक सबसिडी दिली जाणार आहे. याचबरोबर सेंद्रिय शेतीबाबतची माहिती दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जि. पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्ह्याचे कृषी संचालक शिवनगौडा पाटील आदी उपस्थित होते.