100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई नको; सेंद्रीय शेतीसाठी दिली जाणार चालना
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. पण ऊस तोडणी झाल्यानंतर उत्पादक शेतकरी पाचट शेतामध्ये कुजवण्याऐवजी ते जाळतो. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडण्याबरोबरच धूरामुळे प्रदुषण होते. आजूबाजूच्या ऊस शेतीला आग लागण्याचे प्रकार देखील घडतात. यामध्ये पाचट जाळण्याऐवजी शेतीमध्ये ठेवल्यास त्याच्यापासून पिकांना सेंद्रीय खताची मात्रा मिळते आणि जमिनीचा पोत सुधारतो. तसेच पाचटाची कुट्टी केल्यास ते मातीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळते. त्यामुळे चालू अर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे 2 लाख रूपये किंमतीच्या पाचटकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
सीईओ चव्हाण म्हणाले, राज्यात पुणे, बारामती आदी ठिकाणी पाचट पेटवण्याऐवजी त्याचे शेत जमिनीमध्येच संवर्धन केले जाते. पाचटकुट्टी यंत्राद्वारे त्याची कुट्टी करून मातीमध्ये गाढले जाते. त्यामुळे तेथे रासायनिक खतांमुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत होते. पण कोल्हापूर जिल्हा ऊस उत्पादनामध्ये आघाडीवर असताना येथे मात्र शेतकऱ्यांकडून पाचट पेटवून देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जि.प.च्या कृषी विभागाकडून पाचट अभियानाला गती देण्यासाठी 50 टक्के अनुदानावर पाचट कुट्टी यंत्र दिले जाणार आहे.
गांडूळ शेतील प्राधान्य
शेतीमध्ये गांडूळांची पैदास केल्यास जमीन भुसभूशीत राहून जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे गांडूळ खताची निर्मिती करण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जाणार असल्याचे सीईओ चव्हाण यांनी सांगितले.
100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी नको
खरीप हंगाम हा मोसमी पावसावर अवलंबून आहे. यंदा मोसमी पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असला तरी जमिनीमध्ये फारसा ओलावा निर्माण झालेला नाही. कृषी तज्ञांच्या सुचनेनुसार किमान 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत सोयाबीन, भुईमूगसह अन्य खरीप पिकांची पेरणी करू नये असे आवाहन सीईओ चव्हाण यांनी केले.