वृत्तसंस्था/ चेन्नई/नवी दिल्ली
चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतून पाकने काश्मीर प्रश्न उपस्थित करत माघार घेतली. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या क्रीडा ज्योत रॅलीमध्ये 21 जून रोजी काश्मीरचा समावेश होता. या क्रीडा ज्योतीचे काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणात स्वागत करण्यात आले होते. पाककडून काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्याच्या निषेधार्थ या स्पर्धेतून माघार घेतली.
या स्पर्धेमध्ये पाकचा 13 जणांचा संघ दाखल झाला होता. महाबलीपूरम येथील एका हॉटेलमध्ये या संघाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पाकच्या या संघाने हे हॉटेल यापूर्वीच सोडल्याचे समजले. या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतल्याचे सांगण्यात आले. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा क्रीडा ज्योत रॅली जम्मू काश्मीर परिसरातून नेऊन जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये भारताने राजकारण आणण्याचा प्रयत्न केल्याने पाकने या स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती पाकच्या विदेशी मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
या स्पर्धेतून पाकने माघार घेतल्याची घटना दुर्दैवी म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या या स्पर्धे दरम्यान पाक विदेशी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती हास्यास्पद म्हणावी लागेल. कारण या स्पर्धेसाठी पाकचा चमू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतात दाखल झाला होता. पाकच्या हा निर्णय पाक बुद्धिबळ क्षेत्राला हितावह ठरणार नाही, असे एमईएचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.