पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांचे वक्तव्य, पाकिस्तानकडून नंतर खुलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानने इतिहासावरुन धडा शिकला आहे. आम्ही भारताशी सर्व मुद्दय़ांवर गांभीर्याने चर्चा करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी केले आहे. मात्र, भारताशी चर्चा काश्मीरला विशेष दर्जा देणाऱया भारताच्या घटनेतील अनुच्छेद 370 चे निष्प्रभीकरण मागे घेतल्यानंतरच होईल असे स्पष्टीकरण पाक पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून देण्यात आल्याने पाकिस्तानचे खायचे दात दिसून आले आहेत. त्यामुळे भारताने या वक्तव्याची दखल घेतलेली नाही. पाकिस्तानला भारताशी अटी घालूनच संबंध ठेवायचा आहे, ही बाबही शरीफ याच्या वक्तव्यानंतरच्या स्पष्टीकरणाने स्पष्ट झाली आहे.
आयण एकत्र बसू आणि काश्मीरसह सर्व वादग्रस्त मुद्दय़ांवर गांभीर्याने चर्चा करु असा आमचा भारताला संदेश आहे. एकमेकांशी शांततेने रहायचे आहे की नाही, हे आपल्यावरच अवलंबून आहे. संघर्ष करायचा की शांततेने राहून प्रगती साध्य करायची याचाही निर्णय भारत आणि पाकिस्तान यांना घ्यावा लागणार आहे. यामुळे हे आवाहन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन शरीफ यांनी केले.
ट्विरवरुन खुलासा
शरीफ यांनी भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली असली तरी ती सशर्त आहे, असे स्पष्टीकरण पाकिस्तानने ट्विटरवरुन केले आहे. भारताने काश्मीरमध्ये पुन्हा अनुच्छेद 370 लागू करण्याची तयारी दर्शविली तरच भारताशी चर्चा शक्य आहे, असे शरीफ यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले, असे पाकने म्हटले आहे. भारताची आम्ही तीन युद्ध केली. पण त्यांमुळे संकटांमध्ये आणि त्रासामध्येच भर पडली, असेही शरीफ यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते.
पाकची परिस्थिती बिकट पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. अर्थव्यवस्था ढासळली असून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. साध्या गव्हाच्या पीठासाठी लोकांच्या माऱयामाऱया होत आहेत. त्यामुळेच शरीफ यांना आता उपरती आली असावी असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र, पाकिस्तानचा आजवरचा अनुभव पाहता शांततेच्या बोलण्याच्या आग्रहामागे त्याचे कारस्थान दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने सावध असावे, असेही अन्य काही विचारवंतांचे मत आहे.