योजना सुरू होईपर्यंत वार्षिक बिल आकारणीची मागणी
प्रतिनिधी/ कराड
चोवीस तास पाणी योजनेच्या तिमाही बिलांवरून शहरात घमासान सुरू असताना मंगळवारी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी व अन्य संघटनांनी प्रीतिसंगमावर कृष्णा नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले. सद्या नगरपालिकेने नागरिकांना दिलेली तिमाही पाणी बिले अन्यायकारक असून चोवीस तास पाणी योजना सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच वार्षिक बिलांची आकारणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जावेद नायकवडी यांच्या या आंदोलनास मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक सलीम पटेल, समता सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
शहरात पाणी बिलांवरून विविध संघटना, राजकीय पक्ष आंदोलने करत आहेत. या पार्श्वभूमीवर जावेद नायकवडी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कृष्णा नदी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पाण्याबाहेर काढले. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरात पाणी योजनेची तिमाही बिले मीटरप्रमाणे नागरिकांना देण्यात आली आहेत. चोवीस तास पाणी योजना अजून पूर्ण झालेली नाही. असे असताना चोवीस तास पाणी योजनेच्या दराने बिले देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात दोन वेळचे पाणी मिळत असताना सद्या करण्यात आलेली बिलांची आकारणी अन्यायकारक आहे. त्यामुळे चोवीस तास पाणी पुरवठा होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच वार्षिक बिल आकारणी करण्यात यावी. ही मागणी मान्य न केल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.