यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती खेड्यांमधील मतदारांना एक नवा आणि आनंददायक अनुभव येत आहे. त्यांना कित्येक दशकांमध्ये प्रथमच अत्यंत शांततेत मतदान करण्याची संधी मिळाली आहे. या खेड्यांमध्ये मतदान होत असताना, एकदाही सीमेपलिकडून बाँब वर्षाव किंवा गोळीबार झालेला नाही. सीमेवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याने सीमेपलिकडून कोणती कुरापत काढण्याची संधी पाकिस्तानाला मिळालेली नाही.
याचा परिणाम म्हणून सीमावर्ती खेड्यांमध्ये मतदानात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. शनिवारी मतदानाच्या सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अनंतनाग-राजौरी या मतदारसंघात मतदान पार पडले. गेल्या चार दशकांमध्ये प्रथमच अतिशय शांततेने आणि कोणताही अडथळा न येता हे मतदान झाले. प्रारंभी साशंक असणारे सीमावर्ती मतदार नंतर उत्साहाने आणि मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करताना दिसून आले. या मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अडीच पट अधिक मतदान झाले आहे. नौशेरा विभागात दुपारी 1 वाजेपर्यंतच 47.31 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात 18 लाख 36 हजार मतदार आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.22 टक्के मतदान झालेले होते. मतदारांच्या एका संपूर्ण पिढीने असे शांततापूर्ण मतदान कधी अनुभवलेले नाही, अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केली. यासंबंधात त्यांनी केंद्र सरकारला धन्यवादही दिले.