मच्छे गावाला वाली कोण?: शिवारातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे न.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
मच्छे गावात डुकरांचा मुक्तपणे संचार वाढला आहे. गावात सुमारे 600 हून अधिक डुकरांचा वावर असल्याची माहिती नागरिकांनी दिली. डुकरांनी गावच्या शेतशिवारातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मच्छे नगरपंचायत, पोलीस स्थानकात निवेदने देऊनही या डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून मच्छेत डुकरांनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. या डुकरांच्या वावरामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. डुकरांचे कळप शिवारात घुसून ऊस, मका, मिरची, भुईमुग, रताळी व भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. यामुळे गावच्या परिसरातील शेती करायची कशी याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे. डुक्कर गावात बिनधास्तपणे फिरत आहेत. काही जणांच्या घराच्या चौकटीपर्यंत जावून मोठमोठय़ाने ओरडत आहेत. यामुळे वयोवृद्ध व बालके भयभीत होत आहेत, अशी माहिती महिलांनी दिली. गल्लीतून येणाऱया बालकांवर व महिलांच्या अंगावर थेट हल्ला करीत आहेत.
मच्छेजवळील ब्रह्मलिंग मंदिराच्या आजूबाजूच्या ऊस व भातपिकांचे सर्वाधिक नुकसान डुकरांनी केले आहे. डुकरांचा बंदोबस्त करणार कोण? असा सवाल शेतकऱयांतून व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱयांच्या अडचणीत वाढ
भातरोप लागवड करण्यात आलेले तसेच धुळवाफ पेरणी केलेले भातपीक बऱयापैकी बहरून आले आहे. या भातपिकात सध्या दोन वेळा कोळपणी करण्यात आली आहे. या भातपिकात घुसून डुकरांचे कळप नासाडी करू लागले आहेत. यामुळे भात उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी शेतकऱयांनी बियाणे पेरणी, लागवड, मशागत, शेणखत, रासायनिक खत, मजुरी आदींसाठी वारेमाप खर्च केला आहे. पिकांच्या उत्पादनासाठी केलेला खर्च निघणार कुठून, याची चिंता शेतकऱयांना भेडसावत आहे. या डुकरांच्या अधिक वावरामुळे पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहणार, असे शेतकऱयांनी सांगितले.
निवेदनांना केराची टोपली
पंधरा दिवसांपूर्वी मच्छे ग्रामस्थांच्यावतीने नगरपंचायतीवर मोर्चा काढून डुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. नोडल अधिकारी शिवकुमार यांना निवेदन देऊन डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायतीकडून प्रयत्न करावेत, असे निवेदन दिले होते. त्यानंतर दि. 2 जुलै रोजी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी डुक्कर मालकांना सांगावे, असे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते.
यावेळी चांगाप्पा हावळ, सुरेश लाड, संजय धामणेकर, अनिल अनगोळकर, संजय सुळगेकर, सुधीर सुतार, भोमाणी लाड, बसवंत नावगेकर, मारुती लाड आदींसह गावकरी उपस्थित होते.
शेतकऱयांच्या निवेदनांची बेदखल
मच्छे गावात डुकरांकडून पीक-पाण्याचे सतत नुकसान केले जात आहे. आम्ही ग्रामस्थ, देवस्थान पंच कमिटी व शेतकऱयांच्यावतीने मच्छे नगरपंचायतीला याबाबत निवेदन दिलेले आहे. पोलीस स्टेशनमध्येही निवेदन दिले. तरीही या डुकरांचा कोणीही बंदोबस्त करीत नाही. प्रशासनाने आमच्या गावच्या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आम्ही दाद मागायची कुणाकडे? आमच्या गावाला कोणी वाली आहे की नाही? हाच विचार आम्हा गावकऱयांना भेडसावत आहे.
– सुरेश लाड
सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील
आमच्या शेतातील उसाचे नुकसान डुकरांनी केले आहे. नगरपंचायत व लोकप्रतिनिधींचे गावातील या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून गावात डुकरांचा उपद्रव वाढला असून शेतकऱयांसह सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे. मच्छे ग्रा.पं.ला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे गावचा विकास होणे अपेक्षित आहे. मात्र, डुकरांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत.
– अनिल अनगोळकर