उगे पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव, दोन्ही बाजूंच्या प्रस्तावांवर गरमागरम चर्चा
प्रतिनिधी /सांगे
आयआयटी उगे-सांगेतच पाहिजे असा ठराव उगे ग्रामपंचायतीच्या रविवारी पार पडलेल्या ग्रामसभेत घेण्यात आल्याची माहिती सरपंच भारती नाईक यांनी दिली. ही ग्रामसभा सरपंच भारती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर आयआयटीसंदर्भातील विषय नव्हता. परंतु ग्रामसभेच्या नोटिसीनुसार तिघांनी आयआयटी नियोजित जागेत उभारू नये व रद्द करण्यात यावी असे प्रस्ताव, तर पाच जणांनी आयआयटीला आम्हाला हवी असल्याचे नमूद करून त्याला पाठिंबा देणारे प्रस्ताव सादर केले होते, अशी माहिती नाईक यांनी दिली.
यावेळी दोन्ही बाजूंच्या प्रस्तावांवर बरीच गरमागरम चर्चा झाली. तसेच गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजूंचे प्रस्ताव ग्रामसभेपुढे ठेवण्यात आल्यावर आम्हाला आयआयटी पाहिजे असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आल्याचे भारती नाईक यांनी सांगितले. तसेच आम्हा चारही पंचायत सदस्यांचा आयआयटीला पाठिंबा असल्याचे नाईक यांनी सांगितले.
ग्रामसभेसाठी मुळात पंचायत क्षेत्रातील मतदार अपेक्षित असतात व त्यांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे उगे ग्रामपंचायत क्षेत्रातील लोक ग्रामसभेला हजर होते. बाहेरच्या कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे बाहेरचे लोक उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, असेही सरपंच नाईक यांनी स्पष्ट केले.