हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधन आणि सामाजिक जागृती नाटकाच्या माध्यमातून होत असते. इतिहास आम्हाला मार्गदर्शन करत असतो. पुढे येणाऱया अडचणी या मागील अनुभवातून जाणवतात, म्हणूनच गोव्याच्या मुक्तीसंग्रामासारख्या ऐतिहासिक संदर्भ घेऊन नाटकाचे मंचप्रदर्शन झाल्यास या प्रदेशाच्या भल्याच्या दृष्टीकोनातून पुढील पिढीसाठी ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल असे उद्गार हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काढले. बांदिवडे येथील श्री नागेश महालक्ष्मी प्रसादिक नाटय़समाजाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
फोंडा येथील राजीव कला मंदिरच्या मा. दत्ताराम सभागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मधुलिंग नागेश वडियार राजे सौंदेकर, कार्याध्यक्ष सुदिन ढवळीकर, नागेश देवस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर, संस्थेचे अध्यक्ष अजित केरकर, सचिव अरुण काळे आदी उपस्थित होते. नाटक हा गोमंतकीयांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. इतर कुठल्याही दृकश्राव्य माध्यमापेक्षा नाटकांतील जीवंत अभिनय बघण्यात गोमंतकीय प्राधान्य देतात. गोमंतकीयांनी नाटय़ विषय आपला मानला असून गोवेकरांना नाटक शिकविण्याची गरज नाही. पदरमोड करुन हौशी रंगभूमी टिकविणाऱया गोमंतकीयांचे नाटय़क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही. नाटय़निष्ठा, नाटय़प्रेम आणि रसिकता यापुळेच नाटय़वेडा गोमंतक हे संबोधन गोमंत प्रदेशाला लाभले असे ते पुढे म्हणाले.
नाटकाची क्षमता सादरीकणावर ठरते ः मृणाल कुलकर्णी
राजेंद्र आर्लेकर यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करुन अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ज्या जोमाने संस्था सुरु होतात, त्याच नेटाने त्या पुढे कार्यरत राहत नाहीत. परंतु एकोप्याचे दर्शन घडवित सामंजस्याने पुढे जाणाऱया संस्थांचा प्रवास आव्याहतपणे सुरु राहतो. शौर्य, स्वराज्य, निष्ठा, देशाभिमान आदींचे संस्कार बालवयात घडल्यामुळे शिवाजी महाराज घडले. नाटकामध्येही संस्कारक्षम पिढी घडविण्याची ताकद असते. नाटकाची क्षमता केवळ कथानकामुळे नव्हे तरी सादरीकरणामुळे ठरत असते, असे त्यांनी नमूद केले.
श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़समाज या संस्थेच्या माध्यमातून रंगभूमीवर योगदान दिलेल्या रंगकर्मींचा राज्यपाल आर्लेकर यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात दास कवळेकर, दिलीप ढवळीकर, चतुरा रायकर, रामदास नाईक, सिद्धी उपाध्ये, प्रभाकर केरकर, शशिकांत नाईक, गायत्री सिद्धये, मंगलदास नाईक, विणा गावणेकर, सुबोध कुर्पासकर, संतोष केरकर, अरुण काळे, अशोक नाईक यांचा समावेश होता. कै. गोविंद तथा बाळूमामा उपाध्ये, कै. गणपत दाते, कै. नारायण कामत बुडकुले यांचा मरणोत्तर सत्कार करण्यात आला.
कपिलेश्वरी सम्राट क्लबचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष नितीन ढवळीकर यांनी, बांदोडा येथील रवळनाथ प्रासादिक नाटय़मंडळाचा सन्मान गुरुदास नागेशकर यांनी स्वीकारला.
संस्थेच्या आणि संस्थेच्या कलाकारांच्या कार्याची माहिती देणाऱया स्मरणिकेचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याची पहिली प्रत महालक्ष्मी देवस्थानच्या खजिनदारांनी स्वीकारली. स्मरणिकेचे मुख्यापृष्ठ तयार केलेले अमोघ बुडकुले यांनाही यावेळी स्मरणिका प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.
सुदिन ढवळीकर यांनी आपले, मनोगत व्यक्त करताना, आपण या संस्थेच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून जरी आपण नाटय़कर्मी नसलो तरी पडद्यामागील भूमिका आपण यापुढेढी साकारणार असल्याची ग्वाही दिली. सिद्धी उपाध्ये आणि नितीन ढवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
दामोदर भाटकर, मधुलिंग नागेश वडियार राजे सौंदेकर यांचीही यावेळी भाषणे झाली. सुदिन ढवळीकर यांनी नाटय़मंडळाला दिलेल्या भरीव योगदानासाठी राज्यपालांच्याहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. अजित केरकर यांनी स्वागत तर अरुण काळे यांनी प्रास्ताविका केले. अशोक नाईक यांनी सूत्रसंचालन व डॉ. संस्कृती रायकर यांनी आभार मानले.