मणिपूर हा भारताचा भाग आहे आणि तेथील नागरिक भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचेही ऐकल पाहीजे असे म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टिका केली आहे. I.N.D.I.A या भाजपविरोधी आघाडीच्या मणिपूर दौर्याला “शो-ऑफ” किंवा दिखाऊपणा आहे असे भाजपने टिका केल्यावर खासदार संजय राऊत यांनी ही टिका केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी भाजप विरोधी गट असलेल्या इंडिया आघाडीच्या सदस्यांचा मणिपूर दौरा “निव्वळ दिखावा” असल्याचा आरोप केला आहे. या बाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना विचारले असता. ते म्हणाले, “मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर मंत्री आणि आमदारांची घरे जाळली गेली आहेत आणि काही महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षग्रस्त मणिपूर राज्याला भेट तर दिली नाहीच शिवाय ते संसदेत यावर काही बोलले नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, ”पंतप्रधानजी…मणिपूर हा भारताचाच भाग आहे आणि तेथील नागरिक भारतीय नागरिक आहेत…त्यांचे ऐका. पंतप्रधान या गोष्टी ऐकत नाहीत म्हणूनच इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने मणिपूर राज्याचा दौरा केला आहे. तेथील नागरिकांचे दु:ख समजून घेणे आणि त्यांचे सांत्वन करणे याला दिखावा कसा म्हणता येईल?” असा सवाल संजय राऊत यांना केला.
मणिपूरमधील चिघळलेली परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 21 विरोधी खासदारांच्या शिष्टमंडळाने शनिवारी इंफाळला भेट दिली. 3 मे रोजी झालेल्या जातीय संघर्षातील पीडितांना भेटण्यासाठी या शिष्टमंडळांने मदत शिबिरांना भेट घेऊन त्यांनी आज राज्यपालांना निवेदन दिले.