पाटीदार मतपेढी कायम राखण्याचे भाजपसमोर आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटीदारांचा गड मानल्या जाणाऱया सूरत शहरात सुमारे 30 किलोमीटर लांबीचा मेगा रोड शो केला आहे. यादरम्यान त्यांच्या स्वागताकरता मोठा जनसमुदाय उपस्थित होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोक उपस्थित होते आणि ते मोदींच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. हे दृश्य पाहून भाजपला मोठा दिलासा मिळाला असावा. सूरत हा भाजपला बालेकिल्ला असला तरीही पक्षाला यावेळी येथे भीती सतावत आहे. सूरतच्या 12 पैकी 6 मतदारसंघांमध्ये पाटीदार समुदायाची नाराजी हे या भीतीचे कारण आहे.
पाटीदारांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात भाजपचे दिग्गज नेते अयशस्वी ठरल्यारव अखेरचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान मोदी स्वतः सूरतच्या मैदानात उतरले. मेगा रोड शो अन् सभेनंतर त्यांनी सूरत येथील शासकीय विश्रामगृहात वास्तव्य केले. यादरम्यान मोदींनी पाटीदार समुदायाच्या दिग्गज नेत्यांपासून अनेक उद्योजकांची भेट घेतली. तर कित्येकांशी फोनवरून संपर्क साधत भाजपला मोठय़ा बहुमताने विजयी करण्याची जबाबदारी सोपविल्याचे समजते.
मोदी यांची मॅराथॉन बैठक
पंतप्रधानांनी गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील तसेच गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्यासोबत मॅराथॉन बैठक घेतली आहे. या बैठकीदरम्यान अनेक पाटीदार नेत्यांशी भेट तसेच कित्येकांशी फोनवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाटीदार नेते मुकेश पटेल यांची भेट
पाटीदार नेते आणि दिग्गज हिरे व्यापारी मुकेश पटेल हे देखील पंतप्रधानांना भेटण्यासाठी विश्रांतीगृहात पोहोचले. मुकेश पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जाते. मुकेश पटेल यांनी नाराज पाटीदारांची समजूत काढण्यासाठी नरेंद्र मोदींसोबत अनेक उद्योगपतींचा व्हिडिओ कॉल तसेच दूरध्वनीवरून संपर्क घडवून आणला आहे.
मुकेश पटेल ठरले होते ट्रबलशुटर
2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सूरतच्या वराछा मतदारसंघात पाटीदार आरक्षण आंदोलन सुरू होण्याची स्थिती उद्भवली होती. यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार मुकेश पटेल सक्रीय झाले होते. पटेल यांच्यामुळे आंदोलनाला पूर्वीसारखी धार मिळाली नव्हती. याचमुळे मोदींनी नाराज पाटीदारांना भाजपच्या बाजूने वळविण्याची जबाबदारी त्यांनाच सोपविली आहे.
समुदायाच्या अनेक नेत्यांशी चर्चा
पंतप्रधानांनी रविवारी रात्री किरण रुग्णालयाचे अध्यक्ष माथुर सवानी, लवजी बादशाह, लालजी पटेल आणि भावनगर तसेच अमरेली जिल्हय़ातील अनेक सामाजिक नेत्यांशी फोनवरून संपर्क साधला आहे. या सर्वांना स्वतःच्या मतदारसंघातील तरुणाई आणि विशेषकरून महिलांना भाजपच्या बाजूने वळविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.