कोल्हापूर/प्रतिनिधी
वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कोल्हापूर शहरातील वीज यंत्रणेला बसला. शहरात ठिक -ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून, तुटून पडल्याने वीज तारा तुटल्या, वीज खांब वाकले, पडले. या नैसर्गिक आपत्तीमुळे बहुतांश ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर महावितरण कर्मचारी तातडीने कामाला लागले. अपवाद वगळता बहुतांश भागातील वीज पुरवठा दोन ते अडीच तासात सुरळीत केला. पुन्हा एकदा कोल्हापूर महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपत्तीप्रसंगी सज्ज असल्याचे सिद्ध केले.
कालच्या वादळी पवसामुळे कोल्हापूर मंडळात महावितरण यंत्रणेला क्षती पोहचली. १६ उच्च दाब तर ९० लघु दाब वाहिनीचे वीज खांब वाकले वा पडले. १.४४ कि. मी. उच्च दाब तर २२.१६ कि. मी. लघु दाब वीज वाहिनी तुटली.
त्यामुळे ३१ हजार ८०० कृषिग्राहकांचा व १ लक्ष ४७ हजार अकृषिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरण यंत्रणेचे अंदाजे २९ लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.सर्वाधिक नुकसान १७ लक्ष रुपये कोल्हापूर शहर विभागात शहराच्या विविध भागात झाले. सद्यस्थितीत सर्व बाधित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला यश आले आहे.