रांची / वृत्तसंस्था
झारखंडच्या हजारीबाग जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सिजुआ गावात कर्ज वसुलीसाठी गेलेल्या एजंटांनी एका गर्भवती महिलेला ट्रक्टरखाली चिरडून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर महिला तीन महिन्यांची गरोदर असल्याचे आणि चार दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. या घटनेनंतर लोकांनी फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला घेराव घालून कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी कर्जवसुलीसाठी दाखल झालेल्या एका कंपनीच्या 4 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चारही संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हजारीबागच्या सिजुआ गावात राहणाऱया मिथिलेश प्रसाद मेहता या दिव्यांग शेतकऱयाला 2018 मध्ये एका फायनान्स कंपनीने ट्रक्टर खरेदीसाठी कर्ज दिले होते. सुमारे साडेपाच लाखांच्या ट्रक्टरचे हप्ते तो सातत्याने भरत होता. 1 लाख 20 हजार रुपयांचे केवळ 6 हप्ते शिल्लक होते. पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना हे हप्ते भरण्यास विलंब झाला. या कर्जवसुलीसाठी आल्यानंतर कर्जदार आणि फायनान्स कंपनीच्या अधिकाऱयांमध्ये झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.