राज्यात उभारणार चार्जिंग स्टेशन्सचे जाळे
प्रतिनिधी /पणजी
ईलेक्ट्रिक वाहनांचा मुख्य घटक म्हणजे लिथियम बॅटरी. तिची निर्मिती अद्याप भारतात होत नाही. ही बॅटरी भारतात निर्माण होऊ लागल्यानंतर इलेक्ट्रिकल वाहने निम्म्या किंमतीत मिळू लागतील, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
राज्यात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागली असली तरी सध्यस्थितीत त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन्सची संख्या नगण्य म्हणावी एवढीच आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वाहन खरेदीदारांची संख्या अजूनही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. ही अडचण सोडविण्यासाठी सरकारने पावले उचलली असून पुढील दोन आठवडय़ांच्या आत चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकांना त्यांची कोणत्याही प्रकारची वाहने चार्ज करणे सोपे जाणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
बॅटरीमुळे किंमत अधिक
सर्वात महत्वाची बाब म्हणजे सध्या ईलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्तच आहेत. अनेक लोक ती स्वस्त होण्याची वाट पाहत थांबले आहेत. परंतु या वाहनाचा मुख्य घटक असलेल्या लिथियम बॅटरी सध्यातरी भारतात तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांची आयात करावी लागते. या बॅटरीचे उत्पादन भारतात होऊ लागले की मग त्या स्वस्तात उपलब्ध होतील व परिणामी ईलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीही कमी होतील. असाच प्रकार यापूर्वी आपण मोबाईलच्या बाबतीत अनुभवला होता. सुरुवातीला मोबाईल आयात करण्यात येत होते, तेव्हा ते बरेच महाग होते. नंतर त्यांचे उत्पादन देशातच होऊ लागले, तेव्हा दर खाली आले. त्याच धर्तीवर ईलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीही कमी होतील, असे ढवळीकर म्हणाले.
व्यवहारिकपणे जेव्हा लिथियम बॅटरीचे उत्पादन येथे होईल तसेच ईलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढेल तेव्हा सध्या 30 लाख रुपयेपर्यंत किंमत असलेली कार 16 लाख रुपयेपर्यंत मिळू शकेल, असे ते म्हणाले.
भविष्यात वाढू शकते ‘मायलेज’
सध्या एका चार्जिंगमध्ये कार सुमारे 200 किलोमीटर धावू शकते. तसेच पूर्ण चार्ज होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या कार नेण्यात मर्यादा येतात. परंतु जे कमी अंतराचा प्रवास करतात ते ईव्हीची निवड करू शकतात. भविष्यात याही तंत्रज्ञानात बदल होऊन अधिक मायलेज देणाऱया बॅटरीची निर्मिती होऊ शकेल.
आता हायड्रोजनवर चालणाऱया गाडय़ाही बाजारात येत आहेत. भविष्यात इथेनॉलचा वापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण दूर होईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.