प्रतिनिधी/मडगाव
गोवा सरकार आणि जलसंपदा विभाग राज्यातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून सावर्डे मतदारसंघातील काजूमळ-तातोडी येथे लघु धरण बांधण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. या धरण्याचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
काजुमळ-तातोडी भागात भरपूर पाऊस पडतो आणि पाणीही उपलब्ध आहे. अशा ठिकाणी हे लघु धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे. धारबांदोडा येथील ज्यांच्या जमिनी धरण क्षेत्रात बुडणार आहेत त्यांची एक बैठक काजूमळ-तातोडी येथील रसराज फार्ममध्ये स्थानिक आमदार गणेश गांवकर व जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी घेतली.
रसराज फार्मचे मालक राजेंद्र नाईक यांनी धरणासाठी जास्तीत जास्त जमीन दिली आहे. त्यांच्या फार्ममध्ये पूर्णत: सेंद्रिय उत्पादने घेतली जात आहे. त्याच ठिकाणी सभा घेण्यात आली. या बैठकीला सुमारे चाळीस जमीनधारक उपस्थित होते.
जलसंपदा विभागाचे ज्येष्ठ अभियंते दिलीप नाईक, कार्यकारी अभियंते लीलेश खांडेपारकर, आणि सहाय्यक अभियंते दामोदर प्रभुदेसाई उपस्थित जमीनधारकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण देण्यासाठी उपस्थित होते.
धरण क्षेत्रातील बाधितांच्या सर्व तक्रारी सोडविणे, त्यांना सर्वतोपरी मदत करणे, त्यांना घरे बांधून देणे, संरक्षकभिंती बांधून देणे, छोटे बंधारे बांधून देण्याचे आश्वासन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले.
जमिनीमध्ये स्वारस्य असलेल्या सर्व लोकांना जास्तीत जास्त भरपाई देणे आणि आवश्यक प्रक्रिया आणि औपचारिकता पूर्ण केल्यावर सरकारकडून दिलासा मिळावा यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आला. सर्व संबंधितांच्या सहकार्याने डिसेंबर 2025 पर्यंत धरण पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.