सुपिक जमिनी बळकावण्याचा सरकारचा घाट, सरकारच्या निर्णयाविरोधात म. ए. समिती आंदोलन करून निवेदन देणार
वार्ताहर /किणये
बेळगाव तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतातील पिकांच्या उत्पन्नावरच इथल्या शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. शेती वाचली तरच इथला बळीराजा जगणार आहे. त्यामुळे रिंगरोडसाठी आम्ही कदापिही आमच्या सुपीक जमिनी देणार नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटनेने लढा उभारण्याची गरज आहे, असे मनोगत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
बेळगुंदी येथे रिंगरोडच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन सोमवारी रात्री करण्यात आले. गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात जनआक्रोश संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर चौगुले होते. याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी सुंठकर हे उपस्थित होते. सुंठकर पुढे म्हणाले की, प्रशासन विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करू लागले आहे. शेती वाचवणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलन करीत असून या संदर्भात सर्व प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेळगुंदी परिसरातील शेतशिवारात रताळी, बटाटे, भुईमूग व भाजीपाला पिके घेण्यात येतात. तसेच काजू व आंब्याच्या बागायतीसुद्धा आहेत. या जमिनी हिसकावून घेतल्यास इथल्या शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सुपीक जमिनी देणार नाही, असा ठाम निर्धार आम्ही केलेला आहे, असा विश्वास शंकर चौगुले व राजू किणेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी डी. एम. पाटील, परशराम आंबरोळकर, पुंडलिक पावशे, सुनील अष्टेकर, नितीन राजगोळकर आदिंनी आपले विचार मांडले. याप्रसंगी मारुती शिंदे, महेश पाऊसकर, रवळनाथ बोकडे, गणपत बेळगावकर, उमेश पाऊसकर, परशराम शहापूरकर, मारुती बेळगावकर, रामा बिजगर्णीकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.