अध्याय एकोणीसावा
भगवंत निजभक्तीबद्दल उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणाले, भक्तीच्या प्रकारच्या कल्पनेने मनुष्य घोटाळतो पण भक्तीचे प्रकार हे मुळात काल्पनिक असल्याने अस्तित्वातच नाहीत कारण माझी निजभक्ती म्हणून जी आहे, ती एकच होय. ज्या भक्तांच्या हातात ह्या माझ्या भक्तीचे सार खरोखरी आले, त्यांचे सारे व्यापार मद्रूपच होऊन राहतात. म्हणजे तो जे जे करतो तेच यथायोग्य आहे अशा खात्रीने त्यात त्याला सफलता मिळावी या दृष्टीने माझी भूमिका असते. त्यामुळे त्याचे कार्य सोपे होऊन उत्तम रीतीने पूर्ण होते. शम दम हे आज्ञाधारक होऊन दारामध्ये हात जोडून उभे असतात.
ऋद्धिसिद्धि त्याच्या घरामध्ये बटकीसारख्या राबत असतात व विवेक तर कायमच घरचा चाकर होऊन राहिलेला असतो. तो जे काही शब्द बोलतो, त्यांत निःशब्द ब्रह्मच शब्दरूपाने प्रगट होत असते. तो तोंडाने सहज जरी बोलू लागला, तरी त्या बोलाबरोबर माझेच गुणानुवाद बाहेर पडतात. तो परावाणीच्या वर जाताना वैकुंठ व कैलास ह्यांच्या पायऱया चढतो व उन्मनी अवस्थेला बाहेर घालवून सुखशय्येवर निजत असतो. चारही मुक्ती एकत्र होऊन त्याच्या घरी पाणी वाहतात. मी प्रत्यक्ष श्रीहरिसुद्धा लक्ष्मीसहवर्तमान त्याच्या घरात राबतो. अकस्मात त्याच्या तोंडातून ‘तू उद्धरलास’ असे ज्याच्या संबंधाने आले, त्याला मी हृषीकेश हरिने सांगितल्याप्रमाणे निजधामाला पोचवतो.
ज्यांना माझी ‘सहजभक्ती’ प्राप्त झाली, त्यांचे सारे लळे मी अशा रीतीने पुरवितो. उद्धवा! आणखी किती सांगावे ? त्यांची मला अनन्य प्रीती असते हे मी तुला किती प्रकारे सांगू ? अधिक बोलण्यात अर्थ काय? मी देह आणि तो आत्मा आहे असे तू समज म्हणजे झाले. तो माझा जीवप्राण असतो. ह्याचं प्रत्यंतर निजभक्तांनाच येत असतं. सहजभक्तीमध्ये नांदत असला म्हणजे मी देव आणि तो माझा भक्त असतो. एरव्ही भक्त माझ्यामध्ये आणि मी त्याच्या आत बाहेर, असे एकरूपानेच निरंतर राहात असतो. नावाने मात्र बाहेर वेगळे असतो.
जे माझ्या सायुज्याला आले ते मीच होऊन राहिले परंतु मी होऊन जे मला भजतात त्यांना मी ‘भक्त’ असे समजतो. सायुज्याला येऊन सुद्धा जे भक्ती करतात त्यांना भगवंत भक्त असे समजतात. उद्धवा ! सायुज्यमुक्तीपेक्षाही भक्ती गोड आहे. ह्याच निरूपणाची तुझी आवड जाणूनच मी तुला निवाडा करून सांगितला. अशा माझ्या निजभक्तांना दुसरा लाभ म्हणून काही बाकीच राहात नाही. मी श्रीहरि त्यांच्या निजभावानेच सर्वस्वी संतुष्ट होतो. भागवतशास्त्र हे भक्तिप्रधान आहे. त्यातील निजभक्तीचे सार मी तुला अत्यादरपूर्वक यथार्थ रीतीने कथन केले.
उद्धवा ! तुझ्या आवडीच्या निमित्ताने हे माझे गुह्यातील गुह्य तुला सांगितले. सायुज्योत्तर भक्तीतील, मेवा मोठय़ा आवडीने तुला मी दिला आहे. मी ज्या रीतीने आता सांगितले, त्याच रीतीने माझी श्रे÷ भक्ती आचरण करावी. असे म्हणत म्हणत श्रीकृष्णांनी उद्धवाला प्रेमाने उचलले. पीतांबर मागे सारला, शंख चक्र टाकून दिले आणि श्रीहरीने उद्धवाला उचलून घेतले. तरीसुद्धा देवाचे प्रेम आवरेना. दोहो हातांनी काही पुरेसे होईना, म्हणून मग चारही हात पसरले. आणि प्रेमाने उद्धवाला हृदयाशी कवटाळून धरले. हृदयामध्ये हृदय एक होऊन गेले. या हृदयात होते ते त्या हृदयात घातले.
याप्रमाणे कृष्णांनी आपले सर्वस्व उद्धवाला बहाल केले. तसं बघितलं तर, निरिच्छपणा भक्तीची अत्यंत आवड म्हणून उद्धव त्याना इतका गोड लागला व त्याचे स्वानंदाने सर्व कोड पुरविले. उद्धवाच्या प्रेमाची देवाला इतकी आवड की, देवांनी त्याला हृदयाशी कवटाळले. भक्ताला प्रेमाने मारलेली मिठी सोडावयाचीही विसरून गेले. आणि पाहा! कृष्णाच्या हृदयाला हृदय जडल्यामुळे उद्धवही उद्धवपणाला विसरला. अशा प्रकारे आनंदाने व आवडीने दोघेही निष्काम प्रेमामध्ये बुडून गेले. उद्धव तर भक्तिसुखाच्या समृद्धीमध्ये बुडूनच गेला. क्रमशः