काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विदेशात सुटी घालविणे अधिक प्रिय आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी सीमेवर सैनिकांसमवेत व्यतीत करतात. हे दोन्ही नेत्यांच्या कार्यपद्धतीतील अंतर आहे. काँग्रेससाठी वातावरण बिघडले आहे, असे लक्षात आले की, राहुल गांधी विदेशात सुटीसाठी धावतात, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमधील काराकट येथे केली आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी गेली 23 वर्षे सत्तास्थानावर आहेत. तथापि, त्यांच्या विरोधात एक रुपयाचाही भ्रष्टाचार केल्याचा आरोप नाही. या उलट विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार झाकून ठेवण्यासाठीच आघाडी स्थापन केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या भष्टाचाराचा हिशेब 12 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही बाब लोकांपासून लपून रहावी, यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अट्टाहास सुरु आहे. मात्र, ते अपयशी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी गर्भश्रीमंत
काँग्रेस नेते राहुल गांधी हे तोंडात सोन्याचा चमचा धरुन जन्माला आले आहेत. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र काबाडकष्ट करुन प्रयत्नपूर्वक या स्थानापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे ते खरे कष्टकरी जनतेचे प्रतिनिधी आहेत. राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेते पाकिस्तानच्या अणुबाँबला घाबरले असून आता हीच भीती जनतेच्या मनात निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांनी सावधपणे मतदान करुन या पक्षांना अद्दल घडवावी, असे आवाहन त्यांनी केले.