Bharat Jodo Yatra In Madhya Pradesh : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या मध्य प्रदेशात आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पदयात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांचं जन्मस्थान असलेल्या मध्यप्रदेशातील महू या गावात पोहोचल्यानंतर राहुल गांधींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. काल (शनिवारी) राहुल गांधी यांनी इंदूरमधील महू (Mahu) येथे जाहीर सभेला संबोधित केलं. या सभेत संबोधित करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला.
मध्यप्रदेशातील महुत जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी आपल्याला माझं उदाहरण देतो, माझ्या आज्जीवर ३२ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, माझ्या वडिलांना बॉम्बनं उडवून देण्यात आलं होतं. माझ्याविरोधातही हिंसा केली गेली. परंतु ज्या दिवशी माझ्या मनातून भीती गेली तेव्हापासून माझ्या मनात केवळ प्रेम उरलेलं आहे. मी पीएम मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढतो, परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही द्वेष नसल्याचं राहुल गांधी भरसभेत म्हणाले.
हे ही वाचा : कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले सर्वांना माहित ; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
पुढे राहुल गांधी म्हणाले की, इतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते ३५०० किमीचा प्रवास करु शकणार नाहीत. भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, “आज काही लोक संविधान नष्ट करण्यात मग्न आहेत. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. आरएसएस आणि भाजपचे लोक हे संविधान नष्ट करू शकत नाहीत. आरएसएसला संविधानाची ताकद संपवायची आहे.
जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेनं दोन हजार किलोमीटरचं अंतर कापलेलं आहे. या संपूर्ण प्रवासात पदयात्रा केवळ महुसाठी वळवण्यात आली कारण ही आंबेडकरांची, संविधानाची आणि तिरंग्याची भूमी आहे. गेल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जे अधिकार मिळाले नाहीत, ते बाबासाहेबांनी प्रथमच संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना दिल्याचंही राहुल गांधी म्हणाले.