ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्रतेसंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यासाठी आमदारांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून विशिष्ट वेळेत यासंदर्भातील याचिका निकाली काढणं बंधनकारक आहे. त्यामुळे 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. या घटनेचा अभ्यास करून लवकरच विधीमंडळ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणार आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी दोन्ही गटातील आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावली आहे.