देशात श्रीमंत अन् गरीबांमधील दरी वाढतेय : आदिवासी बहुल क्षेत्रात सभा
वृत्तसंस्था / दाहोद
गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी राज्यात पोहोचले. गुजरातमधील आदिवासीबहुल दाहोदमध्ये राहुल यांनी ‘आदिवासी सत्याग्रह सभे’ला संबोधित केले आहे. ही जनसभा नव्हे तर सत्याग्रहाची सुरुवार आहे. नरेंद्र मोदींचे सरकार असताना दोन भारत उदयास येत आहेत, यातील एक भारत श्रीमंतांचा असून त्यात धनाढय़ा लोक आहेत. दुसरा भारत हा सर्वसामान्य जनतेचा असल्याचे म्हणत राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
गुजरात मॉडेल म्हटले जाणारी धोरणे देशात लागू होत आहेत. या मॉडेलचे प्रथम गुजरातमध्ये परीक्षण करण्यात आले आणि मग ते देशात लागू केले गेले. परंतु काँग्रेसला दोन भारत नको आहोत. सर्वांना समान अधिकार आणि सर्व सुविधा मिळणारा भारत आम्ही इच्छितो असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.
मनरेगावरून मोदी लक्ष्य
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत मनरेगाची थट्टा केली होती. परंतु कोरोना काळात मनरेगा योजना नसती तर देशावर काय स्थिती ओढवली असती? पंतप्रधान झाल्यावर मोदींनी प्रथम नोटाबंदी केली, जनतेच्या खिश्यातून पैसा काढला आणि ही काळय़ा पैशाच्या विरोधातील लढाई असल्याचे सांगितले गेले. पूर्ण देशाला बँकेसमोर उभे करण्यात आले. तरीही काळय़ा पैशाच्या विरोधात काहीच घडले नाही. केवळ अब्जाधीशांना लाभ झाल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
2-3 जणांच्या हाती सूत्रे
आदिवासींना या सरकारकडून फार काही मिळाले नाही. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासींचा आवाज उठवू इच्छितो. जगभरात केवळ गुजरातमध्येच आंदोलनासाठी देखील अनुमती घ्यावी लागते. आम्ही जनतेचे मॉडेल गुजरातमध्ये आणू इच्छितो. सध्या केवळ 2-3 जण सरकार चालवत आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास आदिवासींना हक्काचा आवाज मिळणार असल्याचा दावा राहुल यांनी केला.
टीव्हीवर दिसतो केवळ एक चेहरा
थाली बजाओ, असे पंतप्रधान कोरोनावेळी म्हणत असताना महामारीमुळे लाखो लोकांचा जीव गेला. टीव्हीवर केवळ एकच चेहरा दिसून येतो आणि तो नरेंद्र मोदींचा आहे. सध्याच्या सरकारने शाळा बंद केल्या तसेच त्यांचे खासगीकरण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसची पारंपरिक मतपेढी
गुजरातमध्ये राहुल यांच्या आदिवासी सत्याग्रह सभेला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. गुजरातमध्ये अनुसूचित जाती- अनुसूचित जमातीचा सुमारे 40 मतदारसंघांवर विशेष प्रभाव आहे. सभेनंतर राहुल यांनी स्थानिक आदिवासी नेत्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. गुजरातमधील आदिवासी समुदायाला काँग्रेसची पारंपरिक मतपेढी मानले जात राहिले आहे. 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपने काँग्रेसला मोठा झटका देत 5 हून अधिक काँग्रेसच्या आदिवासी आमदारांना स्वतःच्या पक्षात सामील केले आहे. अलिकडेच काँग्रेसचे आदिवासी नेते आणि आमदार अश्विन कोतवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.