प्रवाशांचा प्रतिसाद थंडावला : 6 महिन्यांपूर्वी सुरू झाली होती बससेवा
बेळगाव : सांबरा विमानतळ ते रेल्वेस्थानक मार्गावर सुरू केलेली ‘रेल टू एअर’ बससेवा बंद झाली आहे. त्यामुळे विमान आणि रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. शक्ती योजनेचा ताण वाढल्यामुळे ही बससेवा ठप्प झाली आहे. शक्तीयोजना सुसाट सुरू असली तरी ‘रेल टू एअर’ मात्र जागीच थांबली आहे. विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सांबरा ते रेल्वेस्थानक अशी विशेष बससेवा रेल टू एअर सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात स्पाईट जेट, अलायन्स आणि इतर कंपन्यांच्या विमानसेवेमुळे या बससेवेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, आता दिल्लीची स्पाईट जेट विमानसेवाही बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गावर रिकाम्या बस फिरत होत्या. दरम्यान, तोटा लक्षात घेऊन परिवहनने ही बससेवा थांबवली आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी ही बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सांबरा ते रेल्वेस्थानक असा प्रवास सुखकर झाला होता. विशेषत: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शहरात येणे सोयीस्कर झाले होते. मात्र, आता बससेवा बंद झाल्याने पुन्हा प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसू लागला आहे. रेल्वेस्थानक येथून सुटणारी बस धर्मवीर संभाजी चौक, चन्नमा सर्कल, मध्यवर्ती बसस्थानक, सांबरामार्गे विमानतळावर जात होती. सांबरा विमानतळावरून सुटणारी ही बस सांबरामार्गे मध्यवर्ती बसस्थानक, चन्नमा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक मार्गे रेल्वेस्थानकात पोहोचत होती. या सेवेमुळे प्रवास सुखकर होत होता. मात्र, आता बससेवा बंद झाल्याने खासगी वाहन भाड्याने घेऊन प्रवास करावा लागत आहे.
प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही : -ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर
दिल्लीची स्पाईट जेट विमानसेवा बंद झाली आहे. शिवाय शक्ती योजनेमुळे बसवर अधिक ताण वाढला आहे. त्यामुळे काहीकाळाकरिता ‘रेल टू एअर’ ही बससेवा थांबविण्यात आली आहे. प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाददेखील मिळत नव्हता. त्यामुळे रिकामी बस धावत होती.