अतिरिक्त रेल्वेफेऱ्या सुरू करण्याची मागणी
बेळगाव : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले आहे. विशेषत: मुंबई, बेंगळूर, पुणे, तिरुपती, दिल्ली या मार्गावर बुकिंग वेटींगवर असल्याने प्रवाशांना खासगी बसचा पर्याय उरला आहे. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर उन्हाळी सुट्यांसाठी जादा रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने मागील आठवड्यात म्हैसूर-अजमेर, हुबळी-ऋषिकेश, हुबळी-मुजफ्फराबाद या मार्गांवर उन्हाळी सुट्यांसाठी साप्ताहिक रेल्वे सुरू केल्या आहेत. परंतु, शाळा-महाविद्यालये, तसेच सरकारी कार्यालयांना उन्हाळी सुटी असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे रेल्वेचे तिकीटदेखील फुल्ल होत आहे. बस, विमान यापेक्षा रेल्वेची सेवा किफायतशीर असल्याने प्रवाशांची पहिली पसंती रेल्वेला दिली जाते. सध्या बेळगाव-मुंबई, बेळगाव-बेंगळूर, बेळगाव-पुणे, बेळगाव-तिरुपती व बेळगाव-दिल्ली या मार्गांवर तिकीट बुकिंग फुल्ल होत आहे. मे महिन्यापासून उन्हाळी सुट्यांना सुरुवात होत असल्याने यापूर्वीच नागरिकांनी रेल्वे बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकाच्या तिकीट बुकिंग काऊंटरवर नागरिकांची गर्दी होत आहे. याबरोबरच ऑनलाईन बुकिंगही करण्यात येत आहे. बेळगावमधून सर्वाधिक मागणी ही बेळगाव-तिरुपती रेल्वेफेरीला दिसून येत आहे. केवळ बेळगावचेच नाही तर कोकणातले नागरिकही तिरुपतीला जाण्यासाठी हरिप्रिया एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. मे महिन्यात सुट्यांचा कालावधी असल्याने पुढील महिन्याचे बुकिंग आतापासूनच फुल्ल होत आहे. त्यामुळे बेळगाव-तिरुपती मार्गावर एखादी साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.