नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा– राहुल रेखावार
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कोल्हापूर: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर, सातार, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ८ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. असा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे. तर 9 जुलै रोजी या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कोल्हापुर दुपारी 3 वाजताचे अपडेट
कोल्हापुरात दुपारी तीन वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २६ फूट ३ इंच इतकी आहे. तर
पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.
दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी पूर्णतः बंद
दाजीपूर अभयारण्य आता ऑक्टोबर पर्यंत पर्यटकांसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहे. राधानगरीत पावसाचा जोर वाढला असून सोसोट्याचा वाराही सुटला आहे. काल काही पर्यंटक शाहुवाडीत पावसामुळे अडकले होते. दरम्यान त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तरी पुराच्या पाण्यातून वाहतूक करु नका अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
करवीर तालुक्यात पावसाचा जोर वाढला; कोगे-बहिरेश्वर मार्ग बंद
गेल्या दिड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार एंट्री केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस संततधार सुरु आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान कोल्हापूर करवीर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोगे-बहिरेश्वर बंधारा पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली असून बीड मार्गे वाहतूक सुरु आहे. पुराच्या पाण्यातून वाहतूक करु नका अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.