प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्यातील नेत्रावळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या रजनी गावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे पंचायतीचे पाच वर्षांपूर्वी नूतन मंडळ निवडून आल्यानंतर रजनी गावकर यांची सरपंच म्हणून निवड झाली होती. पुन्हा कार्यकाळ संपत असताना त्यांची सरपंचपदी निवड झाली आहे. नेत्रावळी पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. अर्चना गावकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून तो संमत केल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते.
सरपंचपदासाठी रजनी गावकर यांचे नांव पंच प्रकाश भगत यांनी सूचविले, तर पंच संतोष नाईक यांनी अनुमोदन दिले. सरपंच निवडीवेळी रजनी गावकर यांच्यासह प्रकाश भगत, संतोष नाईक, विठ्ठल गावकर हे पंच हजर होते, तर उपसरपंच अभिजित देसाई, माजी सरपंच अर्चना गावकर व पंच आंतोनेता मास्कारेन्हस अनुपस्थित राहिल्या. निर्वाचन अधिकारी म्हणून हेमंत कुर्डीकर यांनी काम पाहिले.
देसाई यांची अनुपस्थितीवरून चर्चा
दरम्यान, अभिजित देसाई यांच्या अनुपस्थितीने लोकांमध्ये चर्चेला तोंड फुटले आहे. कारण अविश्वास ठरावाच्या नोटिसीवर त्यांनी सही केली होती. तसेच अविश्वास ठराव संमत करण्याच्या बाजूने ते होते. रजनी गावकर यांची सरपंचपदी निवड झाल्याने या कार्यकाळातील त्या जशा पाहिल्या सरपंच ठरल्या होत्या तशाच आता शेवटच्या सरपंच ठरणार आहेत.
मुळात नेत्रावळीत भेटी देणाऱया पर्यटकांकडून फी गोळा करण्याच्या प्रकरणात नेत्रावळी पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदावरील अनुक्रमे रजनी गावकर आणि अभिजित देसाई यांना पंचायत संचालकांनी अपात्र घोषित केले होते. त्यानंतर न्यायालयाने पंचायत संचालकाचा सरपंच आणि उपसरपंचपदाबाबतचा निर्णय फेटाळून सरपंच आणि उपसरपंचाची नियुक्ती कायम ठेवली होती. त्यानंतर पंचायत संचालकांच्या आदेशानुसार सरपंचपदी विराजमान झालेल्या रजनी गावकर यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो संमत करण्यात आला होता. तेव्हापासून अर्चना गावकर सरपंचपदी होत्या. गेल्या पाच वर्षांच्या काळात नेत्रावळी पंचायतीत सरपंच-उपसरपंचपदाचा घोळ बराच गाजला. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पंचायतीचा कार्यकाळ संपण्यास अवघे दिवस शिल्लक असून त्यानंतर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.