ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे. माझ्यासारख्या सामान्य युवकाला संधी दिल्याबद्दल भाजपातील (BJP) वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. मला भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये तीनही उमेदवार सहज निवडून येतील याची मला खात्री आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी नाव जाहीर झाल्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
राज्यसभेची सहावी जागा पहिल्यापासून चर्चेत आहे. छत्रपती संभाजीराजे यासाठी आग्रही होते. मात्र त्यांनी माघार घेताच शिवसेनेने कोल्हापुरचे संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर भाजपने आपला पत्ता ओपन करत तोडीस- तोड म्हणून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली. यामुळे आता कोल्हापुरमध्ये सहाव्या जागेचा निकाल काय लागणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान धनजंय महाडिक यांचे भाजपाने नाव जाहीर करताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले धनंजय महाडिक
राज्यसभेच्या तीनही जागा या मूळच्या भाजपाच्या आहेत. याही वेळी तीनही जागा भाजपाने लढायच्या हे पूर्वीपासून ठरले होते. त्यानुसार या तीन जागा घोषित करण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या संख्याबळामध्ये थोडासा फरक झाला असेल तरी, आज आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचे ब्रँडेड असे १०६ आणि आमच्या सोबत सहयोगी असणारे ७ असे ११३ सदस्य आहेत. साधरण ४२ चा कोठा आहे. एक सदस्य मयत असल्यामुळे ४१ चा कोटा येण्याची शक्यता आहे. आणि असं जर झालं तर साधारण आमच्याकडं ३० ते ३१ मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे १० ते ११ मतांची आवश्यकता आम्हाला भासेल. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी साधारण १५ ते २० सदस्यांची संख्या जुळवून ठेवली असल्याने मला भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये तीनही उमेदवार सहज निवडून येतील याची मला खात्री आहे.