मुदतीत वाढ, 14 सप्टेंबरपर्यंत चालणार प्रक्रिया : अन्नभाग्यसाठी लाभार्थ्यांची दुरुस्तीसाठी धडपड
बेळगाव : अन्नभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची रेशनकार्ड अपडेट आणि दुरुस्तीसाठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. दरम्यान खात्याने रेशनकार्ड दुरुस्तीसाठी ठराविक दिवस निश्चित केले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रेशनकार्ड दुरुस्तीचे काम दि. 12, 13 व 14 सप्टेंबर रोजी चालणार आहे. या कालावधीत लाभार्थ्यांना रेशनकार्ड दुरुस्ती करून मिळणार आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी, त्याचबरोबर अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल कार्डमधील प्रत्येक सदस्याला 170 रुपये दिले जात आहेत. यासाठी ऑनलाईन अर्जनोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती असल्याने ऑनलाईन नोंदणीपासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी प्रथमत: रेशनकार्ड दुरुस्ती अनिवार्य आहे. दरम्यान खात्याने रेशनकार्ड दुरुस्तीसाठी ठराविक दिवस निश्चित केले आहेत. या कालावधीत लाभार्थ्यांनी रेशनकार्ड दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे.
रेशनकार्ड दुरुस्तीचे काम बेळगाव वन आणि इतर सायबर केंद्रांवर चालणार आहे. रेशनकार्डमध्ये नाव बदल, कुटुंब प्रमुखाच्या नावात बदल, नव्या सदस्याचे नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, रेशन दुकान बदलणे आदी कामे केली जाणार आहेत. खात्याने यापूर्वी 10 सप्टेंबरपर्यंत दुरुस्तीची मुदत वाढविली होती. मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी केवळ तीन दिवस देण्यात आले आहेत. दि. 12 ते 14 सप्टेंबरपर्यंत रेशनकार्ड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र रेशनकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने अनेकांना योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांची धडपड सुरू आहे.