मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीतील जाहीर सभेत कोकणवासियांना साद; मुंबई-गोवा महामार्ग रिफायनरी मुद्यावरून लोकप्रतिनिधींचा घेतला समाचार
प्रतिनिधी रत्नागिरी
निसर्गसंपन्न कोकणाला परमेश्वरी आशिर्वाद मिळाला आहे, पण आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला जबाबदार कोकणवासियांनो तुम्ही आहात. त्याच-त्याच व्यापारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांना निवडून देत असल्याने त्यांनी कोकणाचा व्यापार करून ठेवला आहे. इतिहास भूगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन ताब्यात घेतल्यात तुम्ही जमीन विक्रीसाठी काढता आहात आणि परप्रांतियांना विकत आहात. पण प्रकल्प कोणता येतोय, याची माहिती नसताना हे व्यवहार करत आहेत. त्यासाठी सावध रहा, कोकण वाचवा, अशी साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घातली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकण जाहीर सभा अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रत्नागिरीतील कै.प्रमोद महाजन कीडासंकुल मैदानावर झाली. सभेत राज ठाकरे बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर मनसे युवा नेते अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनोज चव्हाण, शिरीष सावंत, नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी वैभव खेडेकर, अविनाश सौंदाळकर, जितेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. या सभेतून राज ठाकरे कुणावर टीका करणार? राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? या बाबत साऱ्यांचे कान टवकारले होते. भाषण सुरू झाले व जोरदार घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. सुरूवातीलाच राज ठाकरे यांनी टोला लगावताना बरेच विषय तुंबलेत, पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाई होणे गरजेचे असल्याचे सांगितल़े हल्ली कोण कुठे आहे, समजत नाही. आमदार समोर येतो तेव्हा विचारावेसे वाटते. सध्या कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोकण महाराष्ट्र राज्याला पोसू शकतो, पण आमच्या राज्यकर्त्यांना त्याचे काहीही देणे-घेणे नाही. हे सर्व तुम्हांला मूर्ख बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर राज ठाकरे यांनी सडेतोड भाष्य केलं त्याच-त्याच निवडून दिल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी कोकणाचा व्यापार करून ठेवला आहे पण राजकारणात या निवडून गेलेल्या लोकांना आज काहीही किंमत उरलेली नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी बोलताना ते म्हणाले, 2007 मध्ये महामार्गाचे काम सुरू झाले, पण अजून ते पूर्ण झालेले नाही. खासदार, आमदार यांना काहीही फरक पडताना दिसत नाही आपुलकीशुन्य ही लोकं असून हीच लोकं आज तुम्ही पुन्हा निवडून देणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या लोकांना मतदानाशी केवळ मतलब राहिले आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण होवून 4 वर्षात सुरूही झाला, पण 16 वर्षे मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होत नाही. कारण येथील लोकांना लोकप्रतिनिधींनी गृहित धरले आहे. त्याविषयी कोकणवासियांना जरादेखील राग येत नसल्याची खंत व्यक्त केली.
प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून बोलताना ते म्हणाले, आपण येथील जागेसाठी भांडतोय. हा प्रकल्प नाणार की बारसूला होणार, याविषयी प्रश्न होता. पण हे बारसू आले कोठून, आज येथील लोकांच्या पायाखालची जमीन निसटून जाते. त्याचा थांगपत्ता तुम्हांला लागत नाह़ी लोकप्रतिनिधी कवडीमोल दामाने जमिनी विकत घेत आहेत़ ते देखील कळत नाह़ी याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र त्याच जागांच्या व्यवहारासाठी फिरत असतात. जमिनी विकत घेतात. या लोकांचे साठेलोटे झालेले असते. अगोदरच जमिनी घ्यायला ते सुरूवात करतात. त्यासाठी कोकणवासियांनी जागे रहा, नाहीतर पश्चाताप होईल. उद्या कोकणात दुसरी भाषा येईल, कारण आपण बेसावध असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेनंतर रत्नागिरीत ही पहिलीच जाहीर सभा झाली. सभेसाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी जोरदार कंबर कसली होती. विराट सभेचा प्रत्यय आणून देण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत होते व त्याचा प्रत्यय शनिवारी या झालेल्या सभेने आला. या सभेसाठी जोरदार बॅनरबाजी, होर्डीग्ज, झेंडे उभारून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे या सभेचा मोठा माहोल तयार झाला होता. या सभेत पूमुख मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर राज ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायातून घोषणाबाजी व टाळ्यांचा कडकडाट झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे भाषण म्हणजे व्यासपीठावरून धडधडणारी तोफ. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा चाहतावर्ग जेवढा पक्षाशी संबंधितांचा त्यापेक्षाही पक्षाबाहेरील चाहत्यांचाही अधिक असतो. त्याचा प्रत्यय शनिवारी जाहीर सभेवेळी आला. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण कोकणातून या सभेला लोक उपस्थित होत़े शनिवारी सायंकाळनंतर या सभेसाठी हा-हा म्हणता गर्दी वाढत गेली. ही गर्दी व या सभा परिसरातील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेनेही मोठी कंबर कसली होती.
शरद पवार यांनी भीतीपोटी राजीनामा मागे घेतला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणार असल्याच्याविषयी राज ठाकरे यांनी जोरदार उपरोधिक टोला लगावल़ा शरद पवार आता सांगतात, मी पुन्हा लढणार. त्यामुळे त्यांना खरंच राजीनामा द्यायचा होता का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केल़ा पण अजित पवार ज्या प्रमाणे वागले ते सगळ डोळ्यादेखत होत असताना त्यांना वाटल असणार की, हा माणूस पुढे सांगेल, ये गप्प बस.. या भीतीपोटी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असणार. ते कधी कोणती गोष्ट करतील, सांगता येत नाही, असेही सांगितल़े
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष बारसूत येऊन गेले
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी बारसू येथे रिफायनरीविरोधी आंदोलकांना भेट देवून गेल़े त्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष ग्रामस्थांची भेट घेवून गेल्याचे त्यांनी सांगितल़े लोकांची भावना ती आमची भावना, पण आता काय अर्थ, निवडून येता तेव्हा जनतेचे हित पाहिले पाहिजे, काळजी घेतली पाहिज़े हे सर्व तुम्हांला मूर्ख बनवताहेत. त्यासाठी सावध रहा. या प्रदेशाची कधीच धूळदाण करतील, असेही राज ठाकरे यांनी सांगितल़े