सुमुद्रात वादळी वारे; शेकडो नौका किनारपट्टीवर
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसामुळे बिघडलेले वातावरण अजूनही सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे समुद्रातील मच्छीमारीला वादळी वातावरणामुळे वारंवार व्यत्यय येत आहे. त्याचा परिणाम येथील मासळीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत.
यावर्षीचा सुरू झालेला मासेमारीचा हंगाम पावसाच्या सावटाखालीच आहे. अजूनही हे वातावरण मोकळे झालेले दिसत नाही. काही दिवस पावसाचा ब्रेक आणि आता पुन्हा किनारपट्टी भागात पाऊस पुन्हा जोरदार सकीय झाल्याचे चित्र आहे. तसेच वाऱ्यांचाही वेग वाढलेला आहे. त्यामुळे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जाताना सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मासेमारी व्यवसायाला या वातावरणाचा मोठा फटका बसत आहे. त्याचा परिणाम मिळणाऱ्या मत्स्योत्पादनावर होताना दिसत आहे. मासळी कमी मिळत असल्याने आता तर मासळीचे दरही गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे हे वाढलेले दर पाहून खव्वयांच्या तोंडचे पाणी पळत आहे.
येथील मासळी बाजारात असलेले मासळीचे किलोचे दर
बांगडा – 180, सुरमई – 700 मोडोसा- 750 सरंगा- 450 पापलेट – 700 कोळंबी टायनी- 150 कोळंबी – 250