राजापूर वार्ताहर
तळकोकणात कोकणचे वैभव असलेली शहरानजीकच्या रानतळे, पाचल भागातील सडे तसेच पठारांवरील सोनकी, तेरडा आदी रानफुल झाडे टेम्पो भरून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावर विक्रीसाठी काहीजण बिनदिक्कत नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील वनस्पती आणि पक्षीमित्र धनंजय मराठे यांनी या कृतीवर आक्षेप नोंदवत स्थानिक पातळीवर लोकजागृती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. ही एक प्रकारे तस्करीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावसाळी दिवसात मोठ्या झाडांना फुले नसतात. परागीभवनचे मोठे काम करणाऱ्या किटकांची गरज भागवण्यासाठी निसर्गरचनेनुसार श्रावण, भाद्रपद महिन्यात कोकणात अनेक प्रकारची रानफुले पठारांवर, सड्यांवर फुलून येतात. याच इटुकल्या-पिटुकल्या फुलझाडांवर या किटकांची जीवनसाखळी, अन्नसाखळी अवलंबून असते. पुढे हा फुलोरा कमी झाला की आपले बी या भागात पुढील वर्षीसाठी सोडून जातात. कोकणातील भातशेती फुलोऱ्याला येते, त्यावेळी हे किटक भातशेतीच्या भरघोस उत्पन्नासाठी महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. अशी ही किटक साखळी बळीराजाच्या हिताचीच असते. त्यांचा अधिवास अशा मुबलक प्रमाणात फुलोरा तोडल्याने एका अर्थी बळीराजाचे नुकसान करत असल्याचे वनस्पती व पक्षीमित्र धनंजय मराठे यांनी सांगितले. कोकणातील समाजामध्ये या बाबत जनजागृती करून असे हे प्रकार थांबवले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.