Kolhapur Heavy Rain Update : हवामान विभागाने 26 जुलैपर्यंत ऑरेंड अलर्ट दिला होता. मात्र आज दुपारी कोल्हापूरसह साताऱ्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. सध्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू होताच महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याचबरोबर नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. पाणी येणाऱ्या संभाव्य ठिकाणावरून नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान तावडे हॉटेल परिसरातील 150 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आज दुपारी 4 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 38 फुट 2 इंच इतकी असून,पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फुट इतकी आहे. धोका पातळी 43 फुटांवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राधानगरी धरण 85 टक्के भरले आहे.