परूळे /प्रतिनिधी
रेडी रेवस सागरी महामार्ग वेंगुर्ले- मालवण दरम्यान ठप्प झालाआहे. रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने याचा फटका वेंगुर्ले तालुक्यातील परूळे, म्हापण,केळुस आदि भागातून विद्यार्थी मालवण येथे शिक्षण घेण्यासाठी नेहमी जात असतात. मात्र , या मार्गावरील एसटी वाहतूक बंद झाल्याने शालेय विद्यार्थी व अधिकारी वर्गाला कामावर जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या मार्गावर फक्त टू व्हीलर वाहतूक सुरू आहे दोन दिवस झाले तरी अजूनही दरडी व मोठ मोठे दगड अद्याप हटविण्यात आलेले नसल्याने याबाबत ग्रामस्थ व वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . दोन दिवस झाले तरी वेंगुर्ले तालुक्यातील व मालवण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही या रस्त्यावर पडलेली दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. मालवण पोलिसांकडून रस्ता बंद असल्याचे फलक रस्त्यावर लावण्यात आले आहेत. मात्र तेही वाऱ्याने पडलेल्या अवस्थेत आहेत. सागरी महामार्गावरील देवली नजीक गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेचा भाग कोसळला होता तो यावर्षीच नव्याने बांधण्यात आला. मात्र, या पावसाने हा कटडा पूर्णपणे वाहून गेला आहे . व रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना या मार्गावरून वाहतूक करणे आता जिकिरीचे ठरणार आहे . काही मोठमोठे दगड या दरडींवर अडकून राहिले आहेत ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे ते तात्काळ हटवण्याची गरज आहे. यावर्षीच रेडी रेवस सागरी महामार्गाला पुन्हा एकदा नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी अस्तित्वात असलेला मालवण वेंगुले दरम्यानचा सागरी महामार्ग आता अखेरची घटका मोजताना दिसत आहे. पूर्णपणे ठीक ठिकाणी दरडी कोसळून हा रस्ता बंद झाला आहे . त्यामुळे अत्यावश्यक वाहतूक व एसटी सेवा सुद्धा बंद झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील चिपी कालवणवाडी दरम्यान सहा ते सात ठिकाणी दरडी व मोठ्या प्रमाणात दगड रस्त्यावर आले आहेत. तर मालवण तालुक्यातील देवली कुंभारमाठ दरम्यान दगड व दरडी कोसळले आहेत.