आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलवाहिनीच्या गळती निवारणासाठी तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एकाचदिवशी 8 ठिकाणांच्या गळती निवारणाचे काम पूर्ण करून शुक्रवारी सायंकाळपासून शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शनिवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हिडकल जलाशयातून बसवणकोळ्ळ आणि लक्ष्मीटेकडी जलाशयात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 8 ठिकाणी गळती लागली होती. गळतीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा करताना अडचण निर्माण होत होती. पाणी गळतीमुळे पाण्याची कमतरता भासत होती. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी गळती निवारणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याकरिता दि. 20 ते 22 पर्यंत पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे एलअॅण्डटीकडून सांगण्यात आले होते. मात्र गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून एकाच दिवशी सर्व गळत्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. गुरुवारी दिवसभर दुरुस्तीचे काम पूर्ण करून मध्यरात्री 2 वाजता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून शहर आणि उपनगरांतील विविध भागात पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच शनिवारी सकाळपर्यंत विविध भागात पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रोटेशनप्रमाणे विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. काही भागात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 दिवस पाणीपुरवठा बंद राहील असे आवाहन करण्यात आले होते. गळती निवारणाचे काम लवकर पूर्ण झाल्याने पाणीटंचाईची समस्या टळली आहे. एकाचदिवशी 8 ठिकाणी दुरुस्ती केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र यापुढे पाणीपुरवठा खंडित केल्यास दोन दिवस आधी पूर्वसूचना देण्यात यावी, अशा प्रतिक्रिया शहरवासीय व्यक्त करीत आहेत.