शेतकरीवर्गातून मागणी : सर्वच रस्त्यांची दुर्दशा
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गावच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीकाठावरील सार्वजनिक विहिरी असलेल्या शिवाराकडे तसेच मार्कंडेय नदीकाठावरील कामतकट्टा शिवाराकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे पावसाळा सुरू होण्यापूर्वी खडीकरण करून पावसाळ्यामध्ये शेतकरी वर्गाला रस्ता सुरळीत करण्याची मागणी असंख्य शेतकरी महिला वर्गातून करण्यात येत आहे. गावच्या पश्चिमेला मार्कंडेय नदीकाठावरील शिवारात जाण्यासाठी कलमेश्वर मंदिरपासून एक गाडीमार्ग तर पुढे एक गाडीमार्ग मार्कंडेय नदीकाठावर खोदाई केलेल्या सार्वजनिक विहिरींकडे जातो. दुसरा गाडीमार्ग कामततट्टा शिवाराकडे असे दोन गाडीमार्ग आहेत. सात आठ वर्षापूर्वी सदर दोन्ही गाडीमार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. यामध्ये सार्वजनिक विहिरींकडे जाणाऱ्या गाडीमार्गाच्या बाजूने गावचे सांडपाणी मार्कंडेय नदीला जाऊन मिळण्यासाठी गटार खोदाई केली आहे. गटारीमध्ये गाळ पडून गटार तुंबल्यामुळे मागीलवर्षी जेसीबीने गटारीतील गाळ गटारीच्या रस्त्याबाजूला ठेवल्यामुळे रस्त्याची रूंदी कमी झाली. त्यातच काळ्या मातीचा गाळ रस्त्यावर पडल्यामुळे पावसाळ्यामध्ये चिखल होत आहे. कामततट्टा शिवाराकडे जाणाऱ्या गाडी मार्गाचेही पक्के खडीकरण नसल्यामुळे पावसाळ्यात चिखल होत आहे. पूर्वी चार वर्षे पक्के खडीकरण होते. तेव्हा शेतकरी वर्गाला पावसाळ्यामध्येसुद्धा दुचाकी, टॅक्टर, रिक्षा नेणे अनुकूल होत होते. शेतीकाम, भांगलणीसाठी महिलांना शेताकडे जाणे अनुकूल होत होते. परंतु दोन वर्षे सदर रस्त्यांच्या देखभालीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ते शेतकरी वर्गासाठी कुचकामी बनले आहेत. पावसाळ्यापूर्वी यावर्षी जर सदर गाडीमार्ग रस्त्याचे खडीकरण झाले नाही तर शेतकरी वर्गाचे शेताकडे जाताना हाल होणार आहेत.
कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची दैनावस्था
भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी उन्ह वारा, पाऊस, थंडीमध्ये काबाडकष्ट करून धान्य व भाजीपाला पिकवितो म्हणून आम्हाला पोटाला खायला मिळते, असे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी सांगत असतात. परंतु पावसाळ्यामध्ये शेतकरी वर्गाला शेताकडे जाण्यासाठी नीटनेटके शिवारातील रस्ते आहेत काय? इकडे कुणाचे लक्ष नाही. म्हणूनच आजही शेतकरी गुडघाभर चिखलातून वाट शोधत शिवाराकडे जाऊन शेती करतो. परंतु याचे सोयरसुतक कुणालाच नाही. चिखलमय रस्त्यावरून डोक्यावर हिरवा चारा खताचे पोते घेऊन जाताना पाय घसरून पडून अनेक शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेकांच्या हात पाय मोडलेले आहेत. परंतु इकडे कुणाचे लक्ष नाही? तेव्हा संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी-लोकप्रतिनिधीनी इकडे त्वरित लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी सदर दोन्ही रस्त्यांचे खडीकरण करून रस्ता सुरळीत करण्याची मागणी होत आहे.