आमदार फरेरा यांची मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
एका विशिष्ट धर्माविरुद्ध वादग्रस्त विधाने करून धार्मिक सलोखा बिघडवणाऱयांविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवावी अशी मागणी हळदोणचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार कार्लुस आल्वीरीस फरेरा यांनी केंद्र सरकारला केली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा तसेच दिल्ली आयटी सेलचे प्रमुख नवीन जिंदल शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर फरेरा यांनी ही मागणी केली आहे. नुपूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिंदल यांना निलंबित करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या आधारे सर्व धर्मांचा आदर करीत असल्याचे भाजपने सिद्ध केले पाहिजे. कतारमधील भारतीय दूतावासाने देखील केंद्र सरकारकडे एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नेत्यांद्वारे केलेल्या वक्तव्यांचे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटले आहेत असे फरेरा म्हणाले.
या वादग्रस्त वक्तव्याबाबत विदेशातून कडव्या प्रतिक्रिया येत असतानाच आश्चर्यकारकरित्या केंद्र सरकारने मौन बाळगणे पसंत केले असून भाजप प्रतिक्रिया देत सुटला आहे असे फरेरा म्हणाले. काही राजकीय नेते नियमितपणे वक्तव्ये करून देशातील वातावरण गढूळ बनवत आहेत. सरकार देखील यावर तोडगा काढत नसल्याने त्यांच्यावरील अविश्वास वाढत आहे. लोकांनी वक्तव्ये केल्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्यास त्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचे किंवा सरकारच्या निर्देषावरून ते करत असल्याचे दिसते. यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. हे तातडीने थांबले पाहिजे. हे लोक राष्ट्र विरोधी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे असे ते म्हणाले.