Resist the forces that destroy common sense in society!
प्रा. प्रवीण बांदेकर यांचे आवाहन
मनुष्यामध्ये अंधश्रद्धा ही जन्मजात नसून ती त्या व्यक्तीवर समाजामार्फत लादली गेलेली असते आणि म्हणूनच ती आपण दूर करू शकतो. सध्या विवेकाचं साम्राज्य नष्ट व्हावे, असे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून देशात हेतूपुरस्सरपणे केले जात आहेत. विवेकी विचार नष्ट करण्याचे संघटित प्रयत्न जोमात सुरू आहेत. ते कार्यकर्त्यांनी समजून घेऊन त्या शक्तीचा प्रतिकार केला पाहिजेत, असे मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले. मालवण येथील नाथ पै सेवांगणाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘आधारस्तंभ व शतकवीर कार्यकर्ता पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रा. बांदेकर म्हणाले की, समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम निर्माण करून विचार करण्याच्या शक्तीला संघटितपणे खीळ घातली जात आहे. यामुळे समाज संभ्रमित झालेला आहे. त्यामुळे बुद्धिजीवींची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रतिगाम्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेले वैचारिक अडथळे आधी दूर करावे लागणार आहेत. वर्तणुकीतील विसंगतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे.प्रा. प्रवीण बांदेकर पुढे म्हणाले की, सध्या देश एका कठीण कालखंडातून जात आहे. देशातील सध्याचे वातावरण चिंताजनक आहे. याला पांढरपेशी लोकांची उदासीनता, थंड राहणं कारणीभूत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर होते.कार्यक्रमाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेबसाईटने एक लाख वाचक संख्या पार केलेल्या फलकाचे अनावरण प्रा. प्रवीण बांदेकर, दिपक गिरमे यांच्या हस्ते करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव देशपांडे यांनी केले. तर पुरस्कारामागची भूमिका मुक्ता दाभोलकर यांनी मांडली. तर सुत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मांडले.या पुरस्कार वितरण सोहळयाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त सचिव दीपक गिरमे, गणेश चिंचोले, सेवागंण चे सेक्रेटरी लक्ष्मीकांत खोबरेकर, मंगलाताई परुळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, अंनिस कार्यकारी समिती मंडळातील सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रवीण देशमुख, रामभाऊ डोंगरे, प्रा. अशोक कदम, अॅड. देविदास वडगावकर, मिलिंद देशमुख यांचे सह महाराष्ट्रच्या २३ जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त अंनिस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी