आमदार रमेश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : भाजप जनसंवाद मेळाव्याचे उचगावात उद्घाटन : मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /उचगाव
बेळगावचा पश्चिम भाग हा शेतकरी आणि नागरिकांसाठी सुजलाम, सुफलाम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात आणण्याचा आमचा संकल्प आहे. या संदर्भात चंदगड तालुक्याचे आमदार आणि कोल्हापूर जिह्यातील खासदार, मंत्री यांची दिल्लीला बैठकसुद्धा यापूर्वी आम्ही घेतली आहे. यासाठी जनतेच्या सहकार्यातून हा प्रकल्प नजीकच्या काळात यशस्वी करू, असे प्रतिपादन बेळगाव जिह्याचे माजी पालकमंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले. उचगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रमेश जारकीहोळी यांचे उचगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन त्यांच्या हस्ते करून उचगाव येथील जागृत देवस्थान मळेकरणी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महाआरती व महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक आणि हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर उपस्थित होते. य् ाावेळी जारकीहोळी पुढे म्हणाले की, बेळगाव ग्रामीणसाठी शिक्षण, आरोग्य, शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
य् ाावेळी बोलताना नागेश मनोळकर म्हणाले की, पश्चिम भागातील जनतेची डोकेदुखी ही तुरमुरी कचरा डेपो आहे. तो कचरा डेपो लवकरात लवकर हटवून त्या जागी विद्यार्थ्यांसाठी एक विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. य् ाावेळी जनसंवाद मेळाव्याचे उद्घाटन रोपटय़ाला पाणी घालून रमेश जारकीहोळी, नागेश मनोळकर तसेच किरण जाधव, रामचंद्र मनोळकर, शंकरगौडा पाटील, महांतेश आलाबादी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश जारकीहोळी आणि नागेश मनोळकर यांचे स्वागत उचगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य किसन नावगेकर, अरुण जाधव, शिवाजी कुरबुर, ब्रह्मानंद पाटील, बाबासाहेब सनदी, राजेंद्र बांदिवडेकर, चंद्रकांत देसाई, गंगाराम सावंत यासह बेळगाव तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी तसेच अनेक ग्रामपंचायतीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आजी माजी सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या जनसंवाद मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्यानंतर सर्वांना मळेकरणी देवीच्या महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. जवळपास वीस ते पंचवीस हजार नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. एन. ओ. चौगुले यांनी सूत्रसंचालन तर कोमल गावडे यांनी आभार मानले.