जगाला महामारीच्या गर्तेत ढकलून आपण मजा पहायची, अशा दिवास्वप्नात असलेल्या चीनचा पाठलाग कोरोना महामारी काही सोडेनाशी झालेली आहे. आज 40 टक्के चीन कडक लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेला आहे. अनेक राज्यातील नागरिकांना कोंडून ठेवलेले आहे. या कोंडीची घुसमट होऊन अखेर चीनी नागरिकांमधील ज्वालामुखी बाहेर पडला. परिणामी अनेक शहरात चीन सरकारविरोधात आंदोलने सुरु झालेली आहेत. देशात सुरु असलेल्या या जनआंदोलनाची दखल घेत झिरो कोविड धोरणात शिथीलता आणण्याचा निर्णय चीन सरकारने घेतलेला आहे.
दुसऱयाच्या तोंडाला काळे फासण्याआधी आपला हात काळा करावा लागतो. त्याची प्रचिती चीन सरकारला एव्हाना आलेलीच आहे. चीनच्या वू हान शहरात 2019 साली डिसेंबर महिन्यात कोरोना साथीचा उद्रेक झाला. चीन सरकारने वू हान व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेतून प्रसरण पावलेल्या साथीचा उद्रेक झाल्याचे जगापासून लपविण्याचा भरपूर खटाटोप केला. पण नव्याने प्रसारीत होत असलेल्या या कोविडच्या नवनव्या व्हेरियंटमुळे या रोगाचा फैलाव करण्यास चीनच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. चीनमध्ये पुन्हा पुन्हा कोरोनाच्या उद्रेकामुळे आता जगाची खात्रीच पटलेली आहे. चीन सरकारने जानेवारी 2020 पासूनच झिरो कोविड पॉलिसीचा अवलंब केला. यात कोविड रुग्ण असलेली घरे, इमारती व गरज पडल्यास छोटय़ा वस्त्याच सील करण्याची मोहिम राबविली. दोन वर्षांनंतरही तेच धोरण सुरु असून चीनी नागरिक प्रचंड दबावाखाली हलाखीचे जीवन जगत आहेत.
चीन सरकारच्या या धोरणामुळे लोकांचे रोजगार तर गेलेच, त्याचप्रमाणे चीनचे कारखानेदेखील बंद पडले आहेत. जगाला पुरवठा करणाऱया देशावर अशी वेळ आल्यावर सगळय़ा जगातील पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली. आपल्या सरकारच्या या दडपशाहीला कंटाळून व जीवाच्या आकांताने चीनमधील काही शहरातील नागरिक रस्त्यावर उतरू लागले. या आंदोलनाला फुंकर मिळाली ती 25 नोव्हेंबर रोजी चीनच्या पश्चिमेकडील शिन झियाह प्रांताची राजधानी उरूमची. येथे एका उंच रहिवासी इमारतीला भीषण आग लागून त्यात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर, या आगीत लॉकडाऊनमुळे इमारतीचे दरवाजे सील केले असल्याने तेथील लोकांचा बळी गेल्याची वदंता आहे. इमारत सील असल्याने आगीच्या घटनेनंतर आतील नागरिक बाहेर पडू शकले नाहीत व अग्निशमन जवान इमारतीत पोहोचू शकले नाहीत. या सगळय़ामुळे तिथल्या दहा नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी झपाटय़ाने चीनभर पसरली. दुसऱयाच दिवशी शांघायमध्ये तीव्र आंदोलने सुरु झाली. खरे म्हणजे उरुमची आणि शांघाय यांच्यातील अंतर चार हजार किलोमीटर आहे. मात्र शांघायमध्ये उरुमची शहराच्या नावाने एक रस्ता आहे. याच रस्त्यावर शांघायमधील नागरिकांनी जोरदार आंदोलन केले.
शांघायमधील या आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या युवक आणि युवतींनी चीन सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यातील प्रमुख घोषणेत शी जिन पिंग चालते व्हा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सत्तेवरून खाली उतरा, अशा घोषणांचा समावेश होता. 1989 साली घडलेल्या बिजिंग येथील तिएनमान मेन चौकातील नागरिकांच्या आंदोलनानंतर अशा प्रकारच्या सरकारविरोधी घोषणा प्रथमच ऐकू आल्या आहेत. तेहतीस वर्षांनंतर अशाप्रकारचे हे पहिलेच आंदोलन असून ते वणव्यासारखे चीनमधील अनेक शहरात पसरलेले आहे. चीन सरकार मोठय़ा
प्रमाणावर दडपशाही मार्गांचा अवलंब करत आहे. तरीही बिजिंग, नानजींग, ग्वाड्जू, हू हान या सगळय़ा मोठय़ा शहरात हे आंदोलन फैलावलेले आहे. चीनी नागरिक सरकारी दमनचक्राची भीती न बाळगता घराबाहेर पडून सरकारविरोधात आवाज उठवत आहेत.
चीनी नागरिक गेल्या दोन वर्षांत चांगलेच भरडून गेलेले आहेत. कोविड झिरो पॉलिसीच्या नावाने घरातच डांबून ठेवल्याने त्यांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने हातात दाम नाही. केवळ सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर सध्या गुजराण करण्याची वेळ देशातील करोडो कुटुंबांवर आलेली आहे. चीन सरकारने गेल्या तीन दशकांत मनमानी पद्धतीने चालविलेल्या विकास कार्यामुळे तेथील पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून चीनमधील अर्ध्या भागात मोठमोठे महापूर व दुसरीकडे दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. झिरो कोविड पॉलिसीमुळे देशातील हजारो कारखाने कित्येक महिने बंद पडलेले आहेत. त्यातच दुष्काळ आणि महापूरामुळे विजनिर्मिती प्रकल्प बंद पडू लागले. शांघायसारख्या शहरात अंधकारमय स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली. विजपुरवठय़ाअभावी कारखाने बंद पडू लागलेत. परिणामी विदेशी कंपन्यांनी आपले उत्पादन अन्य देशांत सुरु केलेले आहे. त्याचाही आर्थिक फटका चीनला भोगावा लागत आहे. चीनी अर्थव्यवस्थेला अनेक झटके बसत आहेत.
देशातील आर्थिक स्थिती विविध कारणाने घसरणीला लागल्याने नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चीन सरकारने आता लडाखमधील गलवान घटनेनंतर अरुणाचलप्रदेशमधील तवांग परिसरात भारतीय सैन्याबरोबर कुरापती काढण्यास सुरुवात केलेली आहे. याच महिन्यात 9 डिसेंबर रोजी शेकडो चीनी सैन्याने तवांग पठारावरून भारतीय हद्दीच्या दिशेने कूच केली होती. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला माघारी पाठविले. यात दोन भारतीय सैनिक जखमी झाले होते. चीनी सैन्याचा खटाटोप केवळ आपल्या आंदोलनकर्त्या नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच आहेत. भारताबरोबर दोन होत करणे 1962 प्रमाणे सोपे नाही. तेव्हाचा भारत हा पंडित नेहरुंचा होता.
आताचा भारत हा नरेंद्र मोदी यांचा आहे. चीन दिसतो तेवढा प्रबळ नाही, आणि भारत वाटतो तितका दुबळा राहिलेला नाही. चीनच्या सीमा चौदा देशांना भिडलेल्या असून त्यातील रशियासहीत अकरा देशांबरोबर सीमावाद सुरु आहे. त्यामुळे भारताबरोबर युद्ध करण्यासाठी चीन आपले सर्व सैन्य लडाख आणि अरुणाचलप्रदेशमध्ये आणू शकत नाही. त्यामुळे चीन आता कोविड आणि अस्मानी संकटाशी कशाप्रकारे सामना करणार हे पाहावे लागेल.
प्रशांत कामत