अध्याय सत्ताविसावा
भगवद्भजन केल्याशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही असे भगवंतांनी सांगितल्यावरउद्धवाने भगवंतांना पुजाविधीबद्दल सविस्तर सांगा अशी विनंती केली. त्यावर भगवंत म्हणाले, माझी आठ पूजास्थाने आहेत त्यापैकी मूर्ती हे माझे पहिले पूजास्थान होय. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे माझी मूर्ती तयार करून तिचे विधीवत पूजन केले असता ती भक्ताला लगेच पावते. साधकाने स्थावर मूर्तीचे पूजन केले असता, त्याचे आवाहन किंवा विसर्जन करावे लागत नाही कारण त्यात स्वयंभू अधिष्ठान असते. वाळूच्या प्रतिमेचे मात्र विसर्जन केले पाहिजे. माती, चित्र इत्यादी प्रतिमांवर फुलाने पाणी शिंपडावे इतर सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावे. शाळीग्रामाच्या मूर्तीमध्ये माझे स्वयंभूच अधिष्ठान असते, त्यामुळे शाळीग्रामाला आवाहन व विसर्जन मुळीच लागत नाही. ह्याशिवाय इतर जंगम म्हणजे चलमूर्ती आहेत, त्यांना आवाहन व विसर्जन लागू आहे. ते आपण साक्षेपाने करावे. हेच सगुण मूर्तीच्या पूजेचे विधीविधान होय. हृदयातील चिद्घन परमात्म्याचेच मूर्तीमध्ये आवाहन करावे आणि पूजा झाल्यावर त्याचे विसर्जन करावे. यात आपणच परिपूर्ण ब्रह्म आहोत ह्याचे कायम स्मरण होण्याकरिता आवाहन विसर्जन करावयाचे असते. त्यामुळे साधकाला आत्मस्वरूपाची आठवण राहते. सगुण पूजेतील गूढार्थही हाच आहे की, आपणच आपले देव आहोत व आपणच आपले पूजक आहोत. हे लक्षात घेतले म्हणजे, आपल्या पूजेमध्ये आपल्याच आत्मस्वरूपाची ओळख होते. देव होऊनच देवाची पूजा करावी, हेच आत्मस्वरूपाचे गोड स्वरूप आहे. उद्धवा! ह्यायोगे साधक हे पावलोपावली सुखसंपन्न होऊन आपोआप चिद्घन बनतात. अशी ही उपासना आहे. हे कृष्णाचे भाषण ऐकताच उद्धव आनंदाने उचंबळून गेला. त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि मला ते निरूपण साद्यन्त सांगावे असे अत्यंत श्रद्धेने म्हणाला. आधीच उद्धव देवांचा लाडका भक्त, त्यात त्याने केलेली श्रद्धायुक्त विनवणी पाहून देवांचा त्याच्याबद्दलचा प्रेमभाव दाटून आला. त्या भरातच ते म्हणाले की, माझ्या सगुण उपासनेचे गुह्य साधकांना माझ्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही कारण हे गुह्य फार गहन आहे. ते माझे गुप्त धन आहे. उद्धवा! तू पूजाविधान विचारलेस, ते नीट लक्ष देऊन ऐक. माती, कापड, लुकण, यांच्याही मूर्ती करतात, त्यांना ‘लेप्या’ असे म्हणतात किंवा कोणी मोठ्या भक्तीने स्थंडिलावरही लिहून काढतात. त्यांना ‘लेख्या’ मूर्ती म्हणतात. लेप्या आणि लेख्या मूर्ती यांना स्नान घालू नये. इतर मूर्तींना यथाविधी स्नान घालावे. प्रतिमा इत्यादींमध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी परंतु निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा केली तरी चालते किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी. माझी पूजा काही भक्त मनोकामना पूर्ण होण्याच्या उद्दिष्टाने करतात त्याला सकाम उपासना असे म्हणतात. पूजक जर सकाम म्हणजे फळाची इच्छा करणारा असेल तर, पूजासाहित्य यथासाङ्ग पाहिजे. पूजेच्या साहित्यात काही कमी असेल तर फळही संपूर्ण मिळत नाही. काही भक्त मात्र कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाहीत त्यांना निष्काम भक्त म्हणतात. त्यांच्या पुजासाहित्यात काही कमी असले तरी चालते कारण भगवंताला उपचारापेक्षा भावच आवडत असतो. अशा वेळी विनासायास जे काय मिळेल, तेवढ्यानेच भगवान् संतुष्ट होतो. उद्धवा! तोच पूजायाग यथोक्त होय. गीतेतही हे मी नवव्या अध्यायात सांगितले आहेच. पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज । ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे? 26? असा तो श्लोक आहे. निष्काम वृत्ती असली म्हणजे फल, मूल, दूर्वा किंवा निर्मळ पाणी एवढ्यानेच म्हणजे सद्भावानेच सगळा पूजाविधी सफळ होतो. जेथे माझ्यावरील प्रेमभाव दृढ असतो, तेथे इतर उपचारांची काय प्रतिष्ठा? भक्तांचा भावच मला गोड वाटतो, त्यायोगे माझ्या भक्तालाही महासुखाचा लाभ होतो.
क्रमश: