अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा ब्रह्मज्ञान मिळवण्याचा सहजसोपा उपाय म्हणजे माझी भक्ती करणे. भक्ती करता करता माझा भक्त माझ्याशी इतका एकरूप झालेला असतो की, मीच सर्व भुतांच्या रूपाने ह्या सृष्टीला सजवले आहे हे त्याने ओळखलेले असते. त्यामुळे त्याला शत्रुमित्र सर्व सारखेच वाटत असतात. कोणाबद्दलही त्याच्या मनात द्वेष असत नाही. सगळ्यांच्याकडे तो दया आणि मैत्रीच्या भावनेने पहात असतो. त्याला कुणी काही बोलले किंवा कुणी त्याचा अपमान केला तरी तो त्यांना क्षमा करून टाकतो आणि त्या क्षमेच्या बळावर दु:ख सोसत असतो. अरे मी त्याच्यावर नुसताच प्रसन्न होत नाही तर त्याच्या चक्क प्रेमात पडतो. एखाद्या घरगड्याप्रमाणे त्याचा आज्ञाधारी दासानुदास होतो. त्याच्या तोंडून एखादी इच्छा व्यक्त व्हायचा अवकाश ती मी पूर्ण करतो. एव्हढेच काय नुसती त्याच्या मनात एखादी गोष्ट हवी असे आले तर ती मी त्याच्यासाठी लगेच हजर करायची तत्परता दाखवतो. पण गम्मत अशी की ह्या भक्ताने त्याचे मन आणि बुद्धी मला अर्पण केलेली असल्याने त्याला स्वत:ची अशी काही इच्छाच होत नाही. जे प्रारब्धानुसार वाटणीला आलेले असेल तेच तो गोड मानून घेतो. त्याचे हे मन आणि बुद्धी मला अर्पण करणे मला फार आवडते. उद्धव भगवंतांचे बोलणे मन लावून ऐकत होता. त्यांची भक्ती करता करता भक्ताला सर्वत्र त्यांचेच दर्शन होऊ लागते. त्यामुळे तो शत्रू मित्र, लांबचा जवळचा असा माणसामाणसात कोणताही फरक करत नाही हे भगवंतांनी सांगितल्यावर त्याच्या असे मनात आले की, हे देवांचे बोलणे वेदांच्यापेक्षा वेगळे आहे. देवा तुम्ही सांगताय त्यापेक्षा वेदात वेगळे सांगितले आहे, असे तो म्हणाला. वेदाज्ञेनुसार पूज्य व्यक्तींचा आदर करावा, दुष्ट व्यक्तींची उपेक्षा करावी, जे तू दिलेल्या कर्माकडे दुर्लक्ष करतात त्यांचे तोंडसुद्धा पाहू नये असे आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व तूच सांगितले आहेस. असं असून सुद्धा आता तूच म्हणतोयस की, तू ज्याच्या प्रेमात पडतोस असा एकनिष्ठ भक्त सर्वांना समान मानतो, त्यांच्यात तुझे अस्तित्व पाहतो एव्हढेच काय, त्याला सर्वजण तुझीच रूपे वाटत असतात. त्यामुळे त्याला कोणापासून भय असे वाटतच नाही. तुझी ही दोन्ही मते परस्परविरोधी आहेत, त्यामुळे मी पूर्णपणे गोंधळून गेलो आहे. तेव्हा माझ्या मनातला विचारांचा गुंता तूच सोडव. वेदाज्ञा प्रमाण मानायची की आत्ता तू सांगितलेले खरे धरून चालायचे ह्याचा कृपया उलगडा कर. भगवंत म्हणाले उद्धवा, तू माझे बोलणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकत आहेस हे पाहून मला आनंद होत आहे. तू विचारलेली शंका रास्तच आहे. भगवद्भजन करणाऱ्याला सर्व भुते समान कशी वाटतात, ह्याचे तुला आश्चर्य वाटते ह्यात गैर काहीच नाही. तुझ्या शंकेचे उत्तर म्हणून मी तुला भगवद्भजन करणाऱ्या भक्ताचा महिमा सांगतो. तू हा महिमा समजून घेतलास की, माझे भजन करणारा वेदांनाही उल्लंघून कसा पुढे जातो हे तुझ्या लक्षात येईल. जेव्हा घनदाट अंधार पडलेला असतो तेव्हा दिव्याचे महत्त्व असते पण जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दिव्याच्या ज्योतीचे अस्तित्वसुद्धा लक्षात येत नाही. त्याप्रमाणे जेथे दृढ अज्ञान असते तेथे वेदाज्ञा प्रमाण मानावी लागते. त्याउलट जो मझे भजन कोणताही भेदाभेद न करता करतो त्याला स्वत: वेद वंदन करतो आणि वेदाचं काय घेऊन बसलायस ज्याच्या मुखातून वेद प्रकट झाले तो मी श्रीपती स्वत: माझी अभेदभक्ती करणाऱ्याला वंदन करतो आणि त्याला वश होऊन राहतो. जेथे माझी अभेदभक्ती केली जाते तेथे मी सेवक म्हणून राहतो आणि त्याचा दास होतो. त्याच्या संसाराचे ओझे मी माझ्या शिरावर घेतो आणि त्याचा योगक्षेम वाहतो. माझ्या कृपेने त्याला आत्मज्ञानाचा लाभ करून देतो आणि ते ज्ञान शेवटपर्यंत टिकवून ठेऊन त्याला मोक्षप्रती नेऊन पोहोचवतो.
क्रमश: