राष्ट्रवादी एक करण्याची भूमिका पवारांनी घ्यावी
युवराज निकम इस्लामपूर
अलिकडील काळात राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्याशी माझे वैचारिक पटत नाही. कोल्हापूरला अजितदादा पवार यांच्या झालेल्या सभे दरम्यान त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत स्नेहातून व्यासपीठावर गेलो, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याबद्दल आपला कसलाच आकस नाही. चिमण डांगे व विश्वनाथ डांगे हे त्यांच्या बरोबर राहून पक्षाचे काम करीत आहेत. शिवसेने सारखी स्थिती होण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस एक करण्याची पालकत्वाची भूमिका शरद पवार यांनी घ्यावी, असे मत जेष्ठ नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केले.
रविवारी कोल्हापुरात अजितदादांच्या सभेवेळी सर्वांना अचानक धक्का देत डांगे हे त्यांच्या व्यासपीठावर गेले. त्यामुळे जिल्हा व राज्यस्तरावर उलट-सुलट चर्चेला उधाण आले. त्याच पार्श्वभूमिवर डांगे यांच्याशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, अजितदादांचा व माझा अनेक वर्षाचा स्नेह आहे. त्यांचे मामा आरएसएस मधील शेतकरी संघटनेचे नेते होते. तर त्यांचा एक मुलगा आमदार होता. तेंव्हापासूनचा त्यांच्याशी स्नेह आहे. शिवाय अजितदादा अर्थमंत्री असतानाच्या काळात चौंडीचे अहिल्यादेवी होळकर स्मारक उभा केले. या स्मारकासाठी मागणी करेल, त्याप्रमाणे त्यांनी निधी दिला. ते अधून-मधून माझी वैयक्तिक चौकशी करीत असतात.
जयंतरावांबद्दल कसलाच आकस नाही, असे सांगून ते म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी व त्यांच्या घराण्याशी जुना संबंध आहे. राजकारणातील काही घटनाक्रमांनी बापू हे माझ्यावर खूश होते. खुजगाव की, चांदोली धरण या वादावेळी मी खुजगाव येथे धरण रद्द करण्याच्या बाजूने होतो. त्यावेळी बापूंच्या समर्थकांनी माझ्या खुनाचा प्रयत्न केला. मुलगा सर्जेराव याचे अपहरण केले. आमच्या गंज्या पेटवल्या. त्यावेळी काहीकाळ दरी निर्माण झाली.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावेळी दिवंगत वसंतदादा पाटील व यशवंतराव मोहिते यांच्यात निवडणूक झाली. त्यावेळी राजारामबापूंनी मोहिते यांची पाठराखण केली. पण, या निवडणुकीत दादा निवडून आले. त्यानंतर बापू राजीनामा देवून जनता पक्षात आले. दरम्यान, दिल्लीत उत्तमराव पाटील हे विरोधी पक्षनेते होते. योगायोगाने त्यांच्या बंगल्यावर राजारामबापू व अटलबिहारी वाजपेयी यांची भेट झाली. वाजेपयी यांना बापू समर्थकांनी मला छळल्याचे माहित होते. त्यावेळी वाजपेयी यांनी माझा व बापूंचा एकत्र हातात-हात घेवून यापुढे एकदिलाने काम करण्यास सांगितले. त्याचवेळी झालेल्या राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीत इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष एम. डी. पवार यांनी कडाडून विरोध केला. व बापूंची वळकटी बांधून मुंबईला पाठवणार, असे वक्तव्य केले. त्यावेळी मी बापूंच्या मागे ठाम उभा राहिलो. त्यामुळे अण्णा डांगे जे बोलतात, ते करतात, अशी भावना बापूंच्या मनात निर्माण झाली. जयंतरावांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा आग्रह मीच धरला. त्यामुळे त्यांच्याशी बंडखोरी करण्याचा प्रश्न येत नाही.
डांगे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार यांनी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष केले. काही निवडणुकांत दौरे केले. भाजपामध्ये असताना दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या समवेत संघर्षयात्रा केली होती. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीने विरोधात असताना लोकहिताच्या यात्रा करण्याची संकल्पना आपण दिली, आता त्याचे क्रेडिट आम्ही घेणार नाही, जमेल तोपर्यंत पक्षाचे काम करीत रहायचं. शरद पवार यांनी न ताणता, समजून घेवून राष्ट्रवादी एकत्रित करावी, अन्यथा 2024 च्या निवडणुकीत अडचणी वाढतील. डाव्या विचारासह जातियवादी पक्षांना विरोध करण्याची भूमिका पवार यांची आहे. पण, 1978 व 2019 मध्ये त्यांनी जातियवादी पक्षांशी जुळवून कसे घेतले ? असा सवाल करुन अटलजींच्या काळात गुजरात महापूर, लातूर भूकंपावेळी पवारांसाठी विशेष पद निर्माण करुन जबाबदारी टाकली, ती त्यांनी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीची दुफळी मिटवावी, पवार यांनी भारताचे नेतृत्व करावे, आणि अजितदादांसह अन्य नेत्यांवर राज्य पातळीवरील जबाबदारी सोपवून मार्गदर्शन करावे, अशी सूचना डांगे यांनी केली.
अजितदादांचा असाही स्नेह
अण्णासाहेब डांगे म्हणाले, अजित पवार यांच्याशी माझा व्यक्तिगत स्नेह आहे. चौंडी स्मारकाला त्यांनी भरीव निधी दिला. त्यापुढे जावून मी प्रकृती कारणास्तव गेल्या महिन्यात कोल्हापुरात डॉ. सचिन पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना 15 ऑगस्ट रोजी अजितदादा हे कोल्हापुरात असताना भेटून माजी विचारपूस करुन गेले. मग, ते कोल्हापूरला सभेसाठी आले असताना त्यांना भेटणे हे माझे कर्तव्य होते. त्यातूनच सभेसाठी गेलो. आणि अद्याप राष्ट्रवादी एकच आहे.
शरद पवारांशी पटत नाही
डांगे यांनी शरद पवार यांच्याशी आपले वैचारिक पटत नसल्याचा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, काही मुद्दे व भूमिका घेवून भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुरुवातीचा काहीकाळ वैचारिक जुळले. पण, मध्यंतरी माझ्या परस्परच्या एका चर्चेवेळी पवार यांनी ‘आता अण्णासाहेब यांच्यामागे पहिल्या सारखी माणसं राहिली नाहीत’, असे मत व्यक्त केले. ते मला एका जबाबदार माणसाने येवून सांगितले. त्यांचे हे वक्तव्य खटकल्याचे डांगे यांनी सांगितले.