आष्टा पोलिसांची कारवाई; वाळव्यातील दोघांना अटक
बागणी (ता. वाळवा) येथे बावची रस्त्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक व आष्टा पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे १५ लाख रुपये किमतीची बोगस कीटकनाशके व बुरशीनाशके जप्त केली. याप्रकरणी बजरंग भूपाल माळी (वय ४२, रा. साखराळे रोड, कोरे मळा, वाळवा) व शशिकांत विलासराव थोरात (वय ४५, रा. कोटभाग वाळवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.
जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांना मंगळवारी बागणी-बावची रस्त्यावर हैदराबाद येथे बनवलेली बनावट औषधे विकण्याच्या हेतूने मोटार थांबल्याचे कळले. त्यानंतर सुरेंद्र पाटील, वाळवा पंचायत समितीचे गुणनियंत्रक निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय बुवा, संगदीप खिराडे, प्रदीप शर्मा व आचल टीका यांच्यासह पथक आष्टा पोलीस ठाण्यात धावले. तेथून हवालदार एस. एस. काकतकर व पथकाची मदत घेऊन सर्वजण बागणी बावची रस्त्यावरील सुभाष यशवंत माळी (रा. काकाचीवाडी) यांच्या घरासमोर आले. तेथे संशयित मोटार (क्र. एमएच ०९ बीबी ९७३९) उभी होती मोटारीची तपासणी केली असता विनापरवाना बनावट शेती औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके मिळून आली. त्याची किंमत १४ लाख ४३ हजार ८०० रुपये आहे. चालक शशिकांत थोरात यांनी ही औषधे मोटारीत ठेवल्याचे आढळले.बजरंग माळी यांच्याकडे कोणताही शासकीय विक्री परवाना नसताना हा साठा केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने ताब्यात घेतलेले नमुने प्रयोगशाळा पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
बजरंग माळी आणि शशिकांत थोरात यांच्या विरोधात विनापरवाना बेकायदेशीर कीटकनाशके, बुरशीनाशकांचा साठा, विक्री व वाहतूक करून शेतकऱ्यांची तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनमित राऊत करीत आहेत.