जत, प्रतिनिधी
ऊसतोड मजूर, कामगार, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुलांच्या जीवनात सर्वांगीण विकास आणणारी शाळा म्हणून उमदी येथील समता आश्रम शाळेची ओळख आहे. पण एका अनपेक्षित घटनेने अर्धशतकी वाटचाल करणाऱ्या या शाळेची बदनामी झाली. अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी आणि सुवर्ण , रौप्य पदके मिळवत जतच्या शैक्षणिक वैभवात भर घालणाऱ्या या संकुलास काळा डाग लागल्याने पालक, आजी, माजी विद्यार्थ्यांच्या हळहळ व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी समता आश्रम शाळेतील १७५ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या गोरगरीब व कष्टकरी शेतकरी मुलांच्या जीवनात शिक्षणाची गंगा आणणाऱ्या या आश्रम शाळेची घटनेने नाहक बदनामी झाली.
कर्नाटकच्या सीमाभागातील ऊसतोड मजूर, कामगार, कष्टकरी वर्गातील, गरीब कुटुंबातील शिक्षणापासून वंचीत असणाऱ्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा उदात्त हेतूने सर्वोदय शिक्षण संस्थेने समता आश्रम शाळा सुरू केली. येथे अतिशय शिस्तबद्धतेने शाळेचे कामकाज चालते. आश्रमशाळेत महाराष्ट्र, कर्नाटकाच्या सीमाभागातील मुले शिक्षण घेतात. याठिकाणी शिकून अनेकजण अधिकारी झाले. महाराष्ट्र व कर्नाटक प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर अनेकजण कार्यरत आहेत. याशिवाय क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात येथील विद्यार्थी नावाजलेले आहेत.
समाजाभिमुख काम करणाऱ्या अशा आश्रमशाळेत रविवारी रात्री अघटीत घडले. संस्था चालकांच्या घराचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. संस्थेचे पदाधिकारी आपल्याच कुटुंबातील मुले म्हणून आश्रम शाळेतील मुलांनाही पाहतात. त्यामुळे साहजिकच कुटुंबातील शुभकार्यातील जेवणासाठी मुलांनाही जेवणाचे निमंत्रण दिले. मुलेही आनंदाने मनोसक्त जेवली. पण दुर्दैवाने मुलांना अन्नातून विषबाधा झाली. हे लक्षात येताच आश्रमशाळेतील शिक्षकांनी याची माहिती प्रथम आरोग्य विभागाला दिली त्यानंतर संस्थाचालकांशी संपर्क साधला. घटना कळताच सर्व मंडळी धावून आले. संचालक मंडळ, पालक, उमदी व माडग्याळ मधील गावकऱ्यांच्या सहकार्याने मुलांवर वेळीच उपचार झाले. त्यामुळे सुदैवाने कोणत्याही अघटीत प्रकार घडला नाही. या अनपेक्षित घटनेने ५० वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या आश्रमशाळेवर बदनामीचा कलंक लागला. त्यामुळे सीमाभागातील पालकांच्यात व माजी विद्यार्थ्यांच्यात नाराजी पसरली आहे.
याबाबत सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस के होर्तिकर म्हणाले, विषबाधेची घटना समजली त्यावेळी अम्हालाही वेदना झाल्या , अस्वस्थ झालो. पण आम्ही नेहमी संघर्षाचा नेहमी सामना करणारी मंडळी आहोत. या प्रसंगाला धैर्याने तोंड देऊन मुलांचे प्राण वाचविले याचे समाधान आहे. पालकांनी, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, यातून उभारी घेऊन शाळा पुन्हा नावारूपास आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.