विट्यात काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेचा समारोप
विटा प्रतिनिधी
मागच्या निवडणूकीत केवळ विरोधकांची विभागणी झाली म्हणूनच मोदी सरकार सत्तेत आले. सरकार विरोधी मतांची बेरीज अधिक होती. म्हणूनच आम्ही यावेळी मतविभाजन टाळण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्रित आघाडी केली आहे. त्याची धडकी मोदींना बसली आहे. यापुढील काळात मोदी सत्तेत आल्यास देशात लोकशाही राहणार नाही, अशी भिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा विट्यात पार पडली. येथील शाळा क्रमांक दोनच्या मैदानावर सभेने पदयात्रेची सांगता झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. माजी मंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, महिला नेत्या शैलजा भाभी पाटील, डॉ. जितेश कदम, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अशोक गायकवाड, रविंद्रअण्णा देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था 183 टक्के वाढली. तर गेल्या नऊ वर्षात केवळ 83 टक्के अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे. पंतप्रधान केवळ जाहीराती करण्यात मग्न आहेत. आपला चेहरा दिसला नाही तर लोक आपल्याला विसरतील, अशी भिती त्यांना वाटत असावी. तुम्ही घोषणा दिल्या, जाहिराती केल्या, पण वस्तुस्थिती वाईट आहे. महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशावर प्रचंड कर्ज वाढले आहे. पंतप्रधानांना अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.
आगामी काळात चार राज्यातील निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातील तीन राज्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. त्यानंतर लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणूका आहेत. या पराभवाचा परिणाम त्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणूका पुढे ढकलल्या जाण्याचा धोका आहे, अशी भिती व्यक्त करीत सर्व प्रकारच्या यंत्रणा वापरून राज्यातील विरोधकांची सरकारे पाडली जात आहेत. मात्र त्यानेही मेळ बसत नसल्याने आता पक्षांची फोडाफोडी सुरू आहे. मात्र जनता फितुरी सहन करणार नसल्याचे सांगत या सरकारमध्ये कोणतेही काम कमिशन शिवाय होत नाही, अशी टिका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.
माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले, सध्याचे केंद्र सरकार पाकीटमार आहे. लोकांना फसवल जातयं. आपण जागे राहिले पाहिजे. नऊ राज्यातील सरकारे हुकूमशाही पद्धतीने पाडली. हे पाडापाडीचे राजकारण थांबले पाहिजे. हा मतदारसंघ डॉ. पतंगराव कदम आणि आमदार मोहनराव कदम यांना मानणारा मतदारसंघ आहे. मात्र 2014 ला काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर काही लोकांचे खरे रंग कळले. मात्र यापुढे आपण निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
विशाल पाटील म्हणाले, अंतर्गत संघर्षाने काँग्रेसचे खरे नुकसान झाले आहे. मात्र आम्ही आता एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्रीत काम करून सांगली जिल्हा राज्यात अग्रेसर करू. आमच्यात भांडणे लावून पोळी भाजण्याचे काम खासदारांनी केले आहे. यापुढची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, असेही पाटील म्हणाले.
डॉ. जितेश कदम म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस खानापूरात कमकुवत असल्याचे बोलले जाते. मात्र हा मतदारसंघ क्रांती घडवेल, असा विश्वास आजच्या सभेने निर्माण झाला आहे. गेल्या नऊ वर्षात लोकांना मनस्ताप झाला आहे. हे सरकार कोणासाठी काम करतय?, असा सवाल डॉ. कदम यांनी उपस्थित केला.
यावेळी खानापूर तालुका बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत चव्हाण, बलवडीचे शिवाजी पवार, रमेश सावंत, निलम सुर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी मनमंदीर उद्योग समुहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, ज्येष्ठ नेते रविंद्रअण्णा देशमुख, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, राजू राजे, विठ्ठलराव साळुंखे, तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सुहास शिंदे यांनी केले तर आभार सुमित गायकवाड यांनी मानले. यावेळी सिकंदर जमादार, विनय भंडारे, अजित गायकवाड, आनंदराव पाटील, सयाजी धनवडे, जयदीप भोसले, सुरेश पाटील, दिग्विजय देशमुख, अभिजीत पाटील, अमित पाटील, शशिकांत देठे, विलास पाटील, सलगरचे तानाजी पाटील, नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कानाला लागणारांचे औषध माझ्याकडे
दरम्यान या कार्यक्रमात विशाल पाटील यांनी आम्ही मतभेद बाजूला सारून एक झालो आहोत. पण काहीजण अजून कानाला लागतात, अशी कोपरखळी मारली. त्यावर, आता कोणाला कानाला लावून घेऊ नका. कोणी आले, तर मला सांगा त्याचे औषध माझ्याकडे आहे, असा इशाराच माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.
जितेशचा शब्द म्हणजे विश्वजितचा शब्द
यावेळी अशोक गायकवाड, रविंद्रअण्णा देशमुख, सुहास शिंदे, विठ्ठलराव साळुंखे आदींनी खानापूर काँग्रेसची जबाबदारी कदम घरातील डॉ. जितेश कदम यांच्याकडे देण्याची मागणी केली. त्यावर डॉ. विश्वजित कदम यांनी खानापूर तालुका कदम कुटूंबीयांची कर्मभूमी आहे. त्यामुळे इथे आमचे लक्ष असणार आहेच. जितेश कदमांना इथली जबाबदारी देतो. त्यांनी दिलेला शब्द म्हणजे विश्वजीतचा शब्द आहे. तो पाळण्याची जबाबदारी माझी असेल, अशा शब्दात डॉ. जितेश कदम यांच्यावर खानापूर विधानसभेची जबाबदारी सोपवली. त्यामुळे तालुका काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.