ओबीसीसाठी अनुसूचित जातीसाठी आठ ठिकाणी संधी; अनेक दिग्गजांचे पत्ते कट, तर बऱ्याच ठिकाणी जुन्यांचा मार्ग मोकळा
सांगली प्रतिनिधी
माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सौ.प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, प्रा. सुषमा नायकवडी, जितेंद्र पाटील, प्रमोद शेंडगे,अरूण राजमाने जगन्नाथ माळी यांच्यासह अनेक दिग्गजांची जिल्हापरिषदेत पुन्हा येण्याची संधी हुकली. तर माजी अध्यक्ष देवराज पाटील , माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, ब्रम्हानंद पडळकर, सम्राट महाडिक , शरद लाड , तम्मनगौडा रवि-पाटील , विराज नाईक , संभाजी कचरे, वैभव शिंदे , रणधीर नाईक आदींच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हापरिषद आरक्षणामुळे जिल्ह्यात कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात 68ieìemeeþer जिल्हापरिषद निवडणूकीची आरक्षण सोडत जाहीर झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या सोडतीकडे जिल्हयाच्या राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले होते. गुरूवारी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांच्या दांडय़ा उडाल्या. तर काहींच्या राजकीय भवितव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आणि महसुल उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी ही आरक्षण सोडत काढली. रितेश चित्रुक या चिमुकल्याच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठय़ा काढण्यात आल्या. या सोडतीमध्ये जिह्यातील 42 जिल्हापरिषद मतदारसंघ खुले झाले असून त्यापैकी 21 ठिकाणी महिला राखीव झाले. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्याने 18 जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी मिळणार आहे.यामध्ये 9 मतदार संघात महिलांना संधी मिळणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी 8 मतदारसंघ राखीव झाले असून यापैकी चार ठिकाणी महिलांसाठी आरक्षित राहतील.
यावर्षी मतदारसंघ वाढल्याने निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्याही वाढल्याने आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. सोडतीत मतदारसंघ आरक्षित झाल्याने बऱयाच दिग्गजांना धक्का बसला. पाच मतदारसंघ सलग दुसऱया वेळी खुले राहिल्याने जुन्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, प्रा. सुषमा नायकवडी, प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, अरूण राजमाने, या माजी पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट झाला.
नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 68 गट आहेत. गुरूवारी आरक्षण काढताना 2002, 2007, 2012 आणि 2017 या चार निवडणुकीमधील आरक्षणाचा विचार करण्यात आला. अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने आरक्षण निघणार असल्याने यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले होते, ते गट वगळण्यात आले होते. अनुसूचित जाती, ओबीसी आणि सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण काढण्यात आली.
जिह्यात तब्बल 42 मतदारसंघ खुले
जिल्हा परिषेदेच्या 68 गटापैकी तब्बल 42 मतदारसंघ खुले झाले आहेत. त्यापैकी 21 ठिकाणी महिलांसाठी राखीव झाले. 42 मतदारसंघात यापूर्वी झालेल्या निवडणुकीत कधीही महिलांसाठी राखीव नव्हते ते महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. कासेगाव, पेठ, कुरळप, बागणी, वाटेगाव, तडसर आरग, करगणी, देवराष्ट्रे, चिंचणी, कवठेएकंद, मणेराजुरी, ढालगाव, कुंडल, अंकलखोप, वाळेखिंडी, मुचंडी, येळावी, पणुंब्रे तर्फ वारुण, मांगले आणि भोसे सर्वसाधारण राहिले.
तर सर्वसाधारण महिलांसाठी आटपाडी, उमदी, भाळवणी, लेंगरे, कडेपूर, बिसापूर, रेठरेहरणाक्ष, नेर्ले, सागांव, मालगाव, नांद्रे, कसबेडिग्रज, हरीपूर, बेडग, डफळापूर, नागेवाडी, मांजर्डे, भिलवडी, कवलापूर, लेंगरे, दुधोंडी आणि म्हैसाळ मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले.
पाच मतदारसंघ पुन्हा खुलेच
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 60 मतदारसंघापैकी 34 गट खुले होते. 2022 च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये 2017 मधील तब्बल पाच जिल्हा परिषदेचे गट पुन्हा खुले राहिले आहेत. त्यामध्ये कुंडल, कुरळप, बागणी, अंकलखोप, मणेराजुरी, चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश आहे.
ओबीसीसाठी 18 मतदारसंघ
ओबीसीसाठी मतदारसंघ आरक्षित करताना यापूर्वी कधीही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित नसलेल्या मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले. अठरा गटापैकी नऊ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करताना चिठ्ठी काढावी लागली. त्यामध्ये बावची, करजगी, एरंडोली, सावंतपूर, चिकुर्डे, माडग्याळ, कुची, बिळूर आणि करंजे हे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी आरक्षित राहिले. तर कवठेपिरान, जाडरबोबलाद, दिघंची, निंबवडे, सावळज वाकुर्डे बुद्रुक, संख, कोकरुड आणि वाळवा हे मतदारसंघ ओबीसी जागांसाठी राखीव झाले.
अनुसूचित जातीसाठी 8 ठिकाणी संधी
अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने आरक्षण निघणार असल्याने यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले होते, ते गट वगळण्यात आले होते. रांजणी, बुधगाव, खरसुंडी आणि बहादूरवाडी हे गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. तर बोरगाव, देशिंग, शेगाव आणि वांगी जिल्हा परिषदेचे गट महिलांसाठी आरक्षित झाले.
नव्या आठ मतदारसंघात पडलेले आरक्षण
मतदार संघ पुनर्रचनेमुळे जिह्यात आठ नवीन जिल्हापरिषद मतदारसंघ निर्माण झाले आहेत, तर पाच गटांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यामध्ये खालील प्रमाणे आरक्षण पडले आहे. निंबवडे (ओबीसी), कवठे-एकंद (ओबीसी) , नांद्रे (सर्वसाधारण महिला) , सांगाव (सर्वसाधारण महिला), करंजे (नामाप्र महिला), सावंतपूर (ओबीसी महिला), बहाद्दूरवाडी (अनुसुचित जाती), कुरळप (सर्वसाधारण), वाळेखिंडी (सर्वसाधारण), करजगी (नामाप्र महिला), माडग्याळ (नामाप्र महिला), हरिपूर (सर्वसाधारण महिला), नर्ले (सर्वसाधारण महिला)
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना या मिनी विधानसभेचे आकर्षण कायमच राहिले आहे. मतदारसंघाच्या आरक्षणाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आरक्षण बदल्याने अनेकांना जिल्हा परिषदेत निवडून जाण्याची संधी हुकली. त्यामध्ये दिग्गजांचाही समावेश असल्याने नेत्यांसह राजकीय कार्यकर्त्यांना धक्का बसला. काही मतदारसंघात आरक्षणामुळे दुसऱया फळीतील कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध झाली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे चित्र दिसून येते.
दरम्यान आरक्षण सोडतीची उद्या (शुक्रवारी) अधिसूचना जाहीर होईल. 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीसाठी हरकती असल्यास तहसिलदार कार्यालयात हरकत दाखल करता येईल. 5 ऑगस्ट रोजी अंतीम आरक्षण यादी जाहीर करण्यात येणार आहे.
या माजी पदाधिकाऱयांचा पत्ता कट
माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे, सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, माजी सभापती प्रमोद शेंडगे, सुषमा नायकवडी, जगन्नाथ नायकवडी, आशा पाटील, अरुण राजमाने, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर.
या दिग्गजांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा
माजी अध्यक्ष देवराज पाटील (कासेगाव), माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, सम्राट महाडिक (पेठ), शरद लाड (कुंडल), ब्रह्मनंद पडळकर (निंबवडे), तम्मनगौडा रवि-पाटील (जाडरबोबलाद), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), संभाजी कचरे, वैभव शिंदे (बागणी), रणधीर नाईक( पणुंब्रे तर्फ वारुण), आप्पाराया बिरादार (मुचंडी), संजीवकुमार पाटील (कुरळप), डी. के.पाटील (चिंचणी), नितीन नवले (अंकलखोप), सतिश पवार (मणेराजुरी) या दिग्गजांच्या जि.प.प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.