आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळय़ात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, या साठी संत तुकाराम महाराज संस्थानने विशेष काळजी घेतली आहे.
आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या दहा जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत श्री तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. या बाबत पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले, पालखी सोहळय़ातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळय़ात 329 दिंडय़ांची नोंद आहे. नव्याने 45 दिंडय़ा सोहळय़ात सहभागी होणार आहेत. सोहळय़ातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. तसेच वाहनांसाठी पास देणे सुरू आहेत. खडकी येथील लष्कराच्या 512 डेपोमध्ये चांदीच्या रथाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. हायड्रॉलिक ब्रेक बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. तसेच आठ सीसीटिव्ही कॅमेरे, जनरेटर बसविण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना पालखी मार्गावरील समस्यांबाबत माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर निवाऱ्यासाठी तंबूची व्यवस्था केली आहे.
पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. मानकरी सेवेकरी, दिंडी प्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. देऊळवाडय़ातील स्वच्छतेसाठी 30 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहे. महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंडय़ांना प्रवेश देण्यात येणार असून, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. देऊळवाडय़ात सुरक्षेसाठी सोळा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सोहळय़ातील प्रमुख आकर्षण असलेले अब्दागिरी, गरुडटक्के इत्यादी साहित्याचे पालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळय़ासाठी संस्थानच्या वतीने दहा हजार गाथा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी मंदिरात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू)
पालखी सोहळा तयारी पूर्ण झाली आहे. दिंडीकराना पत्रव्यवहार झाला आहे. सरकारकडून विविध सोयी सुविधा देण्यासाठी कळविले आहे. देऊळवाडा येथे महिलांसाठी हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत आहे.