भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याकडून विरियातोंचा पर्दाफाश : विरियातो यांचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसची काढली खरडपट्टी
पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नाडिस हे वसाहतवादी मानसिकतेचे सराईत दुतोंडे आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केली आहे. काल बुधवारी पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आमदार दाजी साळकर आणि संकल्प आमोणकर यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी, ‘भारताने गोव्यावर संविधान लादले’ अशा प्रकारचे गंभीर वक्तव्य करून खळबळ माजविलेल्या विरियातो यांच्या यापूर्वीच्या काही देशद्रोही विधानांची कुंडलीच प्रसारमाध्यमांसमोर उघड केली. तसेच ज्या जाहीर सभेतून विरियातो यांनी सदर विधान केले होते, तो व्हिडिओही यावेळी दाखविण्यात आला.
राष्ट्रध्वजास केला होता विरोध
विरियातो यांनी यापूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी वास्कोतील सेंट जासिंतो बेटावर राष्ट्रध्वज फडकविण्यास विरोध करून स्वत:च्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे दर्शन घडविले होते, तसेच एका फादरने शिवाजी महाराजांना उद्देशून अपशब्द वापरले होते. त्यावेळी विरियातो यांनी त्या फादरच्या वक्तव्याचे समर्थन केले होते, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
विरियातो यांची पात्रता तरी आहे का?
अशावेळी सर्व चित्र सप्रमाण स्पष्ट झालेले असतानाही विरियातो देत असलेले खुल्या चर्चेचे आव्हान केवळ पंतप्रधानच नव्हे तर भाजपचा साधा कार्यकर्ताही स्वीकारणार नाही, असे तानावडे म्हणाले. पंतप्रधानांशी चर्चा करण्याची त्यांची पात्रता तरी आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संविधान, बाबासाहेब, नेहरू यांचा अपमान
विरियातो यांनी केवळ संविधानाचाच नव्हे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोवा मुक्तीसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या तमाम स्वातंत्र्यसैनिकांचाही अपमान केला आहे, अशी टीका तानावडे यांनी केली.
निवडणूक आयोगाने विरियातोंना अपात्र करावे
एका बाजूने आपल्या जाहीरनाम्यातून काँग्रेस पक्ष संविधानाचा आदर करण्याची ग्वाही देतो तर दुसऱ्या बाजूने त्यांच्याच पक्षाचा उमेदवार संविधानाचा अनादर करतो, हा प्रकार अनाकलनीय आहे, असे तानावडे म्हणाले. या प्रकरणी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. देशाच्या संविधानावर विश्वास नसलेल्या व्यक्ती निवडणूक लढविण्यास पात्र नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने विरियातोंना अपात्र ठरवावे, अशी मागणी तानावडे यांनी केली.
भाजपच्या मताधिक्यात अजून होणार वाढ
अशाप्रकारे नको त्या वेळी नको ते विधान करून विरियातो यांनी स्वत:बरोबरच काँग्रेसच्याही पायावर धोंडा मारून घेतला आहे. परिणामी जी काही थोडीथोडकी मते मते मिळाली असती तिही ते गमावून बसणार आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांच्या यापूर्वी आम्ही दिलेल्या 50 हजार मतांच्या आघाडी टक्केवारीत कैक पटीनी वाढ होऊन त्या निर्विवाद विजयी होतील, असा दावा तानावडे यांनी केला.