अवघे पाचशे रुपये खिशात घेऊन मुंबईसारख्या मायानगरीत आपले नशीब आजमावण्यासाठी आलेल्या पं. शिवकुमार शर्मा यांनी आपल्या संतुरवादनाने जगभरात लौकिक संपादन केला. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते तबला वाजवत. पण तबल्याच्या तालापेक्षा संतूरने त्यांना मोहिनी घातली. त्याचे मूळ गाव जम्मू. मातृभाषा डोगरा. संगीताचे संस्कार त्यांच्यावर घरातूनच झाले होते. जम्मू आकाशवाणी केंद्रावर त्यांनी काही काळ सहायकाची नोकरीही केली होती. पण तीत त्यांचे मन रमले नाही. तबला सोडून संतुरकडे ते वळाले खरे, पण तत्पूर्वी भारतभरात शततंत्री वीणा या नावाने हे वाद्य जाणकारांना ठाऊक होते. पं. शिवकुमार यांनी आपल्या वादनाने हे वाद्य लोकप्रिय केले. त्यांचे वडील पं. उमादत्त शर्मा यांनी शिवकुमार यांच्यातील संगीतकार विकसित केला. देशातील सर्वात अव्वल दर्जाचा संतुरवादक होण्याची क्षमता आपल्या मुलात आहे, हे त्यांनी ओळखले होते. तसे त्यांनी बोलूनही दाखवले होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शिवकुमार यांनी संगीतसाधना सुरू केली होती. 1955 साली मुंबईत संतुरवादनाचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1960 साली त्यांची ध्वनिफित प्रकाशित झाली. संतुर आणि एकूणच संगीतमधील त्यांची जाणकारी उच्च दर्जाची होती. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी शिवकुमार यांचे गुण हेरले होते. ‘झनक झनक पायल बाजे’ या त्यांच्या चित्रपटाला वसंत देसाई संगीत देत होते. त्यांच्या वादकवृंदात शिवकुमार होते. संगीत हाच आत्मा असलेल्या या चित्रपटात शिवकुमार यांनी संतुरमधून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले. स्वतः व्ही. शांताराम त्यांच्या वादनाने प्रभावित झाले, इतकेच नव्हे तर आपल्या पुढच्या चित्रपटाला संगीत देण्याची ‘ऑफर’ही दिली. पण शिवजींनी ती नम्रपणे नाकारली. नंतरच्या काळात प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासमवेत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. शिव-हरी ही जोडी लोकप्रिय ठरली. ‘फासले’, ‘चांदनी’, ‘लम्हे’ हे वानगीदाखल त्यातील काही चित्रपट. पण ‘सिलसिला’चे संगीत सर्वाधिक गाजले. अमिताभ बच्चन, रेखा आणि जया भादुरी यांच्यातील भावबंधन त्यांनी आपल्या संगीताच्या जादूने अधिक तरल केले होते. शिव-हरी यांनी पं. ब्रिजभूषण काबरा यांच्यासमवेत ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिफित तयार केली. ती अनेक अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आहे. विविध वाद्यांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या हाताला धरून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचा अद्वितीय अनुभव ती देते. डोंगररांगांमधून वाहत्या वाऱयाचा कधी प्रत्यय तर मधूनच पर्वतराजीतून खळखळत येणाऱया अवखळ जलप्रवाहाचा आभास. भारतीय संगीतकारांकडून अशा पद्धतीची ध्वनिफित यापूर्वी क्वचितच बनवली गेली असावी. हौशी रंगभूमीवरील एकांकिका आणि नाटय़प्रयोगांना पार्श्वसंगीत म्हणून या ध्वनिफितीतील संगीतच कित्येक वर्षे वापरले जात असे. या ध्वनिफितीचे एकांतातील श्रवण हा खरा आनंद सोहळा आहे. ‘द ग्लोरी ऑफ स्ट्रिंग’ ही त्यांची ध्वनिफितही संतुरची नजाकत दाखवणारी आहे. तारांना छेडणं आणि चुकवणं हा खेळ किती रमणीय, सुश्राव्य होऊ शकतो याचे दर्शन पं. शिवकुमारांनी घडवले. ते स्वतः उत्तम गायक होते. त्यामुळे गायकाच्या साथसंगतीसाठी संतुरचा वापर कसा करायचा आणि एकल वादनातून संतुरचं वेगळेपण कसे दाखवून द्यायचे याची आंतरिक जाण त्यांच्यात होती. वाद्यवादन हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, ती एक अध्यात्मिक साधना आहे, असे मानणाऱयांपैकी ते होते. भारतीय शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे ते स्वतः म्हणत. वादक आणि श्रोते एकाक्षणी एकच आहेत, असे वाटायला लावणारे त्यांचे संगीत होते. आपल्या वादनाने श्रोत्यांनी टाळय़ांचा कडकडाट करण्याऐवजी निशब्द होऊन अंतरात्म्यात एकप्रकारची शांतता अनुभवावी, असे शिवजींचे म्हणणे होते. तसा हुबेहुब अनुभव ते अनेकवेळा देत. भारतातील अनेक संगीत महोत्सवांसह जगभरात त्यांच्या अनेक मैफली झाल्या. श्रोत्यांची दृष्टी बाहेरून आत वळवण्याचे सामर्थ्य त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे. प्रख्यात विचारवंत जिधू कृष्णमूर्तींनी माणसाला विचाररहित अवस्थेत जाण्याची शिकवण दिली, शिवकुमारांच्या संतुरवादनाने ही किमया अनेकदा साध्य केली आहे. त्यांचे वादन ऐकताना माणूस देहभान हरपतो. विचाररहित अवस्थेत आपसूक जातो. त्याचे एक कारण म्हणजे त्यांची उत्स्फूर्तता. संतुरवर राग छेडताना अचानक त्यांना नवीन काही सुचे, त्याचे इतके विलोभनीय दर्शन ते घडवत की श्रोते स्तिमित होत. विशेष म्हणजे, शास्त्रीय गायन-वादनातील काहीही न कळणारे श्रोतेदेखील रंगून आणि रमून जात. शिवजींनी संतुरवादनाचा एक अद्भूत प्रयोग केला. पूर्ण वाढ झालेल्या गर्भाला त्याच्या मातेच्या माध्यमातून केदार आणि यमन हे राग ऐकवले. त्यांना ते खूप आवडल्याचे निरीक्षण डॉ. स्नेहलता देशमुख यांनी नोंदवले. मुंबई विद्यापीठाच्या त्या काहीकाळ कुलगुरू होत्या. गर्भावर संगीताचा अनुकूल परिणाम होतो, हे त्यांनी साडेतीनशे गर्भवती महिलांवर प्रयोग करून सिद्ध केले. शिवजींच्या संतुरवादनाचे त्यासाठी मोठे योगदान लाभले होते. 1955 पासून भारतीय संगीतसृष्टीवर आपल्या वादनाने गारूड करणाऱया या कलावंताच्या नावे अनेक विक्रम आहेत. पद्मविभूषण, तानसेन सन्मान, संगीत कला अकादमीसह अनेक महत्त्वाच्या पुरस्काराचे ते मानकरी होते. त्यांची अर्धांगिनी असलेल्या मनोरमा यांचे शिवजींच्या साधनेत मोठे योगदान आहे. पत्नी मनोरमामुळे अनेक संकटाच्या प्रसंगातून सहजतेने बाहेर येणे शक्मय झाले, अशी कृतज्ञ नोंद शिवजींनी केली आहे. भारतीय संगीत अमर्त्य आहे, असे ते म्हणत. शिवलोकात गेलेल्या शिवकुमारांच्या या वाक्मयाचा आधार घेऊन सांगायचे तर संतुरवादनाच्या रूपाने ते रसिकांच्या आत्म्याला अखंड ऊर्जा देत राहतील, यात शंका नाही.
Previous Articleस्वीसच्या वावरिंकाची विजयी सलामी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.