श्रीकांत जाधव,तुरंबे
Ratnagiri School News : राधानगरी तालुक्यातील बोक्याच्या धगरवाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहेत अशा गळक्या शाळेतच गेल्या तीन वर्षांपासून मुले शिक्षण घेतात.मात्र जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने याकडे लक्ष सुद्धा दिले नाही.पाण्यात बसून मुलांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. साहेब तरीही या गंभीर समस्याकडे कोणीही लक्ष दिले नाही अशी तक्रार येथील महिला पालकांनी केली आहे.एकीकडे वाड्यावस्त्याचा सर्वांगीण विकास आम्ही केला अशा वल्गना करणाऱ्यांनी किमान या शाळेला तरी भेट द्यावी अशी माफक अपेक्षा येथील धनगर बांधवांनी व्यक्त केली.
शिक्षणाची पंढरी म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील बोक्याचा धनगर वाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.पहिली ते चौथीपर्यंत शाळा येथे आहे.गेल्या तीन वर्षापासून गळक्या शाळेतच मुलांना शिक्षण घ्यावे लागते ही शोकांतिका आहे.दुर्गम आणि डोंगराळ भागात असण्राया या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे.मात्र मूलभूत सुविधा मिळत नाहीत ही लाजिरवाणी बाब आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असल्याचे पालकांनी सांगितले.मात्र जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाचे कोणी इकडे फिरकलेच नाही.याचबरोबर येथील मुलांना पिण्याचे पाणी सुद्धा येथे नाही ते घरातून पाणी घेऊन जातात.अशा अनेक मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. गळतीचे प्रमाण जास्त आहे यामुळे शाळेच्या भिंती फलक आणि सर्व साहित्य ओल झाली आहे.मोठ्या पावसात तर सर्वत्र मोठमोठी गळती लागतात. या रोजच्या गळतीने आमच्या मुलांच्या पायाला जखमा झाल्या असल्याची खंत येथील महिला पालकांनी व्यक्त केली.
दरम्यान, या शाळेत दोन शिक्षक असताना एकच शिक्षक हजर होता तर अंगणवाडीच्या इमारतीला कुलूप लावले होते यामुळे अंगणवाडीची काही मुले घरी परत गेली तर काही शाळेच्या बाहेर बसली होती येथील अंगणवाडी सेविका आले नसल्यामुळे कुलूप लावले असल्याचे पालकानी सांगितले .तर गटशिक्षणाधिकारी यांनी डायरीत नोंद करून घेतली असल्याचे शिक्षकांनी सांगितले.अशा या गंभीर बाबीकडे गटशिक्षणाधिकारी लक्ष तरी कधी देणार आणि येथील मुलांना मूलभूत सुविधा कधी मिळणार अशीच विचारणा येथील पालकांच्यातून होत आहे.येथील पालक प्रामुख्याने धनगर बांधव आहेत यामुळे अनेक गोष्टींचे ज्ञान नाही यामुळे दाद कोणाकडे मागायची अशी विचारणा पालकांनी केली.तरुण भारतच्या माध्यमातून आमच्या या शाळेची अवस्था तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिक्रायांना कळू देत असे पालकांनी सांगितलं.