प्रसन्न करंदीकर यांनी मांडले विचार : वसंत व्याख्यानमालेचे गुंफले तिसरे पुष्प
प्रतिनिधी /बेळगाव
विज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे ज्याचा अभ्यास करून आपण बदल घडवू शकतो. भविष्यात आपण सकारात्मक बदल करू शकतो व आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते. विज्ञानाच्या संशोधनाचा लगेचच फायदा होईल असे नसते. विज्ञानात प्रयोग करताना हे प्रथम प्राण्यांवर केले जातात. मनुष्य व उंदीर यांच्या शरीराची रचना बहुतांश सारखी असल्याने पहिले प्रयोग हे उंदरावर केले जातात. त्यानंतर मनुष्याला ते औषध दिले जाते, असे विचार चिपळूण येथील प्रसन्न करंदीकर यांनी मांडले.
वसंत व्याख्यानमाला सोसायटीतर्फे शुक्रवारी आयोजित व्याख्यानमालेत ‘आजचे विज्ञान’ या विषयावर प्रसन्न करंदीकर यांनी तिसरे पुष्प गुंफले. व्यासपीठावर अध्यक्षा प्रा. मिना खानोलकर, उपाध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार उपस्थित होत्या. प्रसन्न यांनी थ्री डी पिंटींग, बर्थ कंट्रोल पॅच, आबासी वास्तव, स्मार्ट कार यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
जगातील एक तृतियांश महिलांना टोक्सोप्लाज्मा
टोस्कोप्लाज्मा हा एक असा आजार आहे जो कोणत्याही प्राण्याच्या मेंदूवर आघात करतो. ज्या प्राण्याची रोगप्रतिकार क्षमता अधिक आहे. त्याला याची जाणीव होत नाही. परंतु ज्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, त्याला मात्र हा आजार होतो. एका शास्त्रज्ञाने केलेल्या सर्व्हेक्षणात जगातील एक तृतियांश गर्भवती महिलांना हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आजारामुळे मनातील भिती कमी होऊन मनुष्य शेवटच्या टोकाला पोहोचतो असेही करंदीकर यांनी नमूद केले.
मिना खानोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रियांका केळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षांच्या हस्ते ज्योती हार्डीकर यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रियांका केळकर यांनी मांडले. यावेळी बेळगाव परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अशोक केसरकर यांचे आज व्याख्यान
हेरवाडकर शाळेच्या सभागृहात सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत शनिवार दि. 16 रोजी सायंकाळी 5.30 वा. अशोक केसरकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे –
अशोक केसरकर हे दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण सोसायटी येथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. आपटे वाचन मंदिर वाचनालयाचे संचालक आहेत. 40 वर्षाहून अधिक काळ सहकार क्षेत्रात प्रशासन सेवा करून जनसंपर्क अधिकारी म्हणून निवृत्त झाले. गेली 25 वर्षे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नियतकालिकांमध्ये लेखन केले असून ‘शंभर धागे सुखाचे’ ‘धगधगते अग्निकुंड’ ‘ज्ञान मार्गाचा सांगाती’ ‘जसं सुचलं तसं’ या चार पुस्तकांचे लेखन केले असून, प्रवास वर्णनपर लेखन सध्या सुरू आहे. आकाशवाणीवर चिंतन या सदरामध्ये भाषणे प्रसारीत आहेत. रोटरी, लायन्स क्लब व इतर ठिकाणी भाषणे दिली आहेत.